जेवणानंतर तुम्ही सुद्धा ‘या’ पदार्थांचे सेवन करताय का! मग आजच ही सवय बदला

अनेकांना जेवणानंतर लगेच चहा किंवा काॅफी पिण्याची सवय असते. परंतु ही सवय आरोग्यासाठी खूपच हानिकारक आहे असे म्हटले जाते. जेवणानंतर लगेचच चहा किंवा कॉफी पिणे आरोग्याच्या दृष्टीकोनातून हानिकारक आहे. यामुळे पचनक्रियेत अनेक अडचणी निर्माण होतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जेवणाच्या एक तासापूर्वी आणि एक तासानंतर चहा किंवा कॉफी पिऊ नये. कॉफी/चहामध्ये असलेले रसायन टॅनिन आर्यनमुळे पचनप्रक्रियेत अडथळे येतात. अतिरिक्त प्रमाणात चहा/कॉफी पिण्याच्या सवयीमुळे अ‍ॅनिमियाचा त्रास सुद्धा होण्याचा संभव असतो. सोबतच हात-पाय थंड पडणे, डोके दुखी आणि भूक न लागणे यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.

रिकाम्या पोटी फळांचं सेवन केल्यास शरीरास अधिक फायदेशीर ठरते. दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण किंवा नाश्त्यानंतर फळांचं सेवन करणं टाळावं. जेवणानंतर तुम्ही फळं खाल्ली तर फळांचं पचन योग्य पद्धतीनं होत नाही. शिवाय शरीराला फळांमधील पोषक घटक देखील मिळत नाहीत. तुम्हाला फळांचं सेवन करायचं असल्यास जेवणानंतर काही मिनिटांचं अंतर ठेवून फळे खावीत.

पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यासाठी पाणी पिणे अतिशय गरजेचं आहे. पण जेवणानंतर तातडीनं पाणी पिणं टाळा. जेवणानंतर थंड पाणी तर अजिबातच पिऊ नये. जेवणानंतर लगेचच थंड पाणी पिण्यामुळे अन्नपदार्थ एकाच ठिकाणी साचून राहतात. यामुळे पचन प्रक्रियेत बाधा निर्माण होते आणि जेवण पचण्यास जड जाते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, जेवणानंतर ४५ मिनिटांनंतर साधे पाणी किंवा कोमट पाणी प्यावे.

(कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)