
महायुती सरकारच्या काळात पीकविमा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप विरोधकांनी केले. एवढेच नव्हे तर 2024 च्या खरीप हंगामात राबविण्यात आलेल्या पीकविमा योजनेत घोटाळा झाल्याची कबुलीही कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी गेल्या महिन्यात दिली होती. आता माणिकराव कोकाटे यांनी मोठे विधान केले आहे. भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयात पीकविमा देतो, असे माणिकराव कोकाटे म्हणाले. अमरावतीत माध्यमांशी संवाद साधताना एका प्रश्नावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाहीत. आणि आम्ही एक रुपयात पीकविमा देतो. त्याचा लोकांनी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारचा गैरप्रकार की बाकीच्या राज्यातल्या लोकांनी ऑनलाइन अर्ज दाखल केलेत. मोठ्या प्रमाणात अर्ज साचले, खूप फोपावले. त्यातून असं वाटतंय की पीमविमा खूपच चांगली योजना आहे की काय? पण प्रत्यक्षात चौकशी केल्यानंतर आम्ही चार लाख अर्ज नामंजूर केले आहेत. सरकार त्यात कुठेही अडचणीत आलेलं नाही. पण अशा पद्धतीचे लोक अर्ज भरतात. कुठेतरी एजन्सी केंद्रावाले हे सगळे उद्योग करत असावेत, असा माझा अंदाज आहे. त्याचीही चौकशी सुरू आहे. त्यावरही कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे माणिकराव कोकाटे म्हणाले.
भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयात पीकविमा देतो; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य pic.twitter.com/3R9Sp4lxpM
— Saamana Online (@SaamanaOnline) February 14, 2025
योजनेत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सुधारणा काय-काय करायच्या कशा करायच्या ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याशी चर्चा केल्यानंतर ठरवण्यात येईल, असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.