![nana patole](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/12/nana-patole-696x447.jpg)
राज्यात GBS चा पहिला रुग्ण सापडून एक महिना झाला आणि या एका महिन्यात या आजाराने 8 मृत्यू झाले आहेत. या आजाराचे रुग्ण आता मुंबईतही सापडत आहेत.मात्र, राज्य सरकार या आजाराकडे फारसे गांभिर्याने पहात असल्याचे दिसत नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
नाना पटोले म्हणाले की, जीबीएसचा पहिला रुग्ण 9 जानेवारीला पुण्यात सापडला आणि आतापर्यंत जवळपास 170 ते 175 रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये 100 पेक्षा जास्त रुग्ण पुणे शहर, ग्रामीण तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात सापडले आहेत. यातील 50 रुग्ण आयसीयुमध्ये असल्याचे समजते. मुंबईत या आजाराने एकाचा मृत्यू झाला. जीबीएस रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्याच्या सुचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. त्याचे पुढे काय झाले? सरकारने यासाठी काही विशेष उपाय योजना केल्या आहेत का? जीबीएसच्या रुग्णाला द्याव्या लागणाऱ्या एका इंजेक्शनची किंमत 20 हजार रुपये आहे असे समजते. एवढ्या किंमतीचे इंजेक्शन सर्वसामान्यांना परवडणारे नाही. राज्य सरकारने त्यासाठी काही तरतूद केली आहे का? केवळ सूचना करून काही होणार नाही, ठोस पावले उचलावी लागतील, असे नाना पटोले म्हणाले.
जीबीएसमुळे पहिला मृत्यू झाला त्याचवेळी आम्ही सरकारला जागे केले होते. पण सरकारला त्यांच्यातील अंतर्गत वादातून जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. राज्याचा आरोग्य विभाग या आजाराला तोंड देण्यासाठी किती सक्षम आहे, काय उपाययोजना केल्या, खबरदारी काय घ्यावी यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची जाहिराबाजी केली जाते. मात्र, जीबीएससारख्या गंभीर आजाराच्या जनजागृतीसाठी व उपाय योजनांसाठी सरकार पैसा खर्च करत नसेल तर राज्याचे दुर्दैव आहे असेही नाना पटोले म्हणाले.