![bachchu kadu ladaki bahin bachchu kadu ladaki bahin](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/bachchu-kadu-1-696x447.jpg)
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणण्यात आलेली ‘लाडकी बहीण’ ही योजना अजूनही चांगलीच चर्चेत आहे. लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा सरसकट पैसे वाटण्यात आले. तेव्हा पात्रतेचे निकष पाळण्यात आले नाहीत आणि सरकार आल्यानंतर मात्र सरकारने पात्रतेचे निकष कडक केले. तसेच ज्या बहिणी अपात्र ठरतील त्यांच्याकडून आधी देण्यात आलेले पैसे वसूल करण्यात येतील असेही जाहीर केले आहे. यामुळे विरोधकांनी देखील सरकारला लक्ष्य केलं आहे. तर आधी सरकारचे सोबती असलेले माजी आमदार बच्चू कडू यांनी देखील राज्य सरकारचा समाचार घेतला आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेची चौकशी केली पाहिजे. निवडणूक आयोगानं जर खरोखर पारदर्शक पद्धतीने चौकशी केली तर थेट नेत्याच्या खिशातून पैसे न जाता बजेटमधून सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन मतं ओढण्याचा प्रयत्न झालेला आहे. म्हणजे ही स्कीम लाडक्या बहिणींसाठी नव्हतीच सत्तेत येण्यासाठी होती. मग सत्तेत येण्यासाठी ज्यांनी दोन महिन्यात करोडो लाडक्या बहिणींची चौकशी, चाचपणी न करता पैसे जाहीर करून दिले. याला जबाबदार कोण?
– बच्चू कडू
नेत्याच्या खिशातून पैसे न जाता बजेटमधून सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन मतं ओढण्याचा प्रयत्न झालेला आहे. म्हणजे ही स्कीम लाडक्या बहिणींसाठी नव्हतीच सत्तेत येण्यासाठी होती, असा आरोप बच्चू कडू यांनी केला. तसेच या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाडक्या बहिणींची फसवणूक करत गुन्हा केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तुम्ही निकष न पाळता पैसे जेव्हा बहिणींच्या खात्यात टाकले आणि आता तुम्ही सांगतात त्या पात्र नाहीत पैशे द्यायच्या अगोदर पात्र ठरवायचं की दिल्यानंतर अपात्र ठरवायचं? म्हणजे सरकारनं हा व्यवस्थित क्राइम आहे, व्यवस्थित गुन्हा केला आहे आणि आता पुन्हा बजेटमधला अडचणीचा विषय लक्षात घेऊन लाखो बहिणींना त्यातून बाहेर काढत आहेत. मतं घेतली आणि आता पैसेही परत घेत आहेत. व्यवस्थित चिटिंग आहे, फसवणूक आहे.
– बच्चू कडू
एकूण लाडक्या बहिणींची परस्थित बघता या विरोधात ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले आहेत त्यांनी खरं तर रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे, असा सल्ला वजा आवाहन बच्चू कडू यांनी केलं आहे.