कुंभमेळ्यातील मृतांच्या संख्येवर बोलताच भाजपवाल्यांमध्ये ‘भगदड’ उडाली; संजय राऊत यांचा सणसणीत टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी राज्यसभेत देशातील लोकशाही आणि महाकुंभमध्ये झालेल्या दुर्घटनेबाबत भाष्य केले. महाकुंभमध्ये झालेली घटना ही मनुष्यवधाची असून या दुर्घटनेला सरकारच जबाबदार असा हल्ला त्यांनी सरकारवर चढवला. यावेळी त्यांनी कुंभमेळ्यातील मृतांच्या आकडेवारीबाबत भाष्य करताच तुमची वेळ संपली आहे, त्यामुळे तुम्ही जे बोलत आहात, ते रेकॉर्ड होणार नाही, असे सभापतींनी सांगितले. यावर संजय राऊत यांनी एक्सवरील पोस्टद्वारे टीका करत कुंभमेळ्यातील मृतांच्या संख्येवर बोलताच भाजपवाल्यांमध्ये ‘भगदड’ उडाली असे म्हटले आहे.

कुंभमेळा हा फक्त राजकीय इव्हेंट करण्यात आला. चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना घडल्यानंतर चेंगराचेंगरी झालीच नाही. ती अफवा आहे, असे खोटे सांगण्यात आले. जनतेचा मृत्यू होत असेल आणि सरकार सांगत असेल की कोणतीही दुर्घटना घडलीच नाही, तर हे खूप गंभीर आहे. या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला आणि 60 जण जखमी झाले, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, हे आकडे खरे आहेत काय? सरकारने सत्य लपवू नये, सत्या देशासमोर मांडावे, एकाही जणाचा मृत्यू झाला असेल तर तो मनुष्यवध आहे. त्यासाठी सरकार जबाबदार आहे, असही संजय राऊत यांनी सुनावले.

या दुर्घटनेच 30 जणांचा मृत्यू आणि 60 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात आकडेवारी खूप मोठी आहे. या दुर्घटनेत सुमारे 2 हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अनेक मृतदेह कचऱ्यात पडल्याचेही सांगण्यात येत आहे, असे संजय राऊत यांनी सांगितल्यानंतर सभापतींना तुमची वेळ संपली आहे, असे सांगत त्यांनी बोलण्यापासून रोखले. तसेच तुम्ही जी आकडेवारी सांगत आहात. त्यांची पुष्टी करा, असेही सभापतींनी सांगितले.

याबाबत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी म्हटले आहे की, आपण काय चुकीचे बोललो होतो. मात्र, आपला माइक बंद करण्यात आला. कुंभमेळ्याच्या दुर्घटनेत 30 पेक्षा जास्त जणांनी जीव गमावला आहे. आपण अवढेच बोललो आणि सभागृहात बसलेल्या भाजपवाल्यांमध्ये ‘भगदड’ उडाली; त्यांचे असा का झाले, असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजपला जबरदस्त टोला लगावला आहे.