मानवाच्या 38 कवट्या, हाता पायाचे सांगाडे घेऊन नेपाळला पळत होता, पोलिसांनी केले गजाआड

बिहारमधील स्मशानभूमींमधून मानवी सांगाडे गायब होत असल्याच्या बातम्या समोर येत असताना हिंदुस्थान-नेपाळ सीमेवरील बिहारमधील जोगबनी भागात एका कारवाईत पोलिसांनी 38 मानवी कवट्या आणि हाता पायांचे सांगाडे जप्त केले. हे सांगाडे रिक्षात लपवून नेपाळला नेले जात होते. ही तस्करी नेपाळमधील बिराटनगर येथील रहिवासी बिनोद राय याने केली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हिंदुस्थान आणि नेपाळमधील खुली सीमा तस्करीसाठी आव्हानात्मक ठरत आहे.

अलिकडेच बिहारमधील अनेक जिल्ह्यांमधील स्मशानभूमींमधून मानवी सांगाडे गायब झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दरम्यान, नेपाळ पोलिसांना हे मोठे यश मिळाले आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या एसएसबीला चकमा देऊन तस्कराने सांगाडे नेपाळला नेण्याचा प्रयत्न केला होता. पण नेपाळ सशस्त्र पोलिस दलाच्या जवानांना एका रिक्षाची झडती घेताना हे सांगाडे सापडले. हे सांगाडे रिक्षात एका पिशवीत भरून नेले जात होते. बिनोद राय  याची कसून चौकशी केली असता त्याने हे सांगाडे नेपाळहून चीनला पाठवण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. तिथे या सांगाड्यांचा वापर सौंदर्यप्रसाधने आणि अंमली पदार्थ बनवण्यासाठी केला जाईल. मानवी सांगाड्यांची तस्करी हिंदुस्थान आणि नेपाळ दोन्ही देशांमध्ये चिंतेचा विषय बनत आहे. बिहारमधील अनेक जिल्ह्यांमधून स्मशानभूमीतून सांगाड्यांच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. या संदर्भात, तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत असून तस्करी नेटवर्कचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

हिंदुस्थान आणि नेपाळमधील खुली सीमा तस्करीसाठी एक मोठा धोका बनत चालली आहे. जोगबनी सीमेवर ओळखपत्रे तपासली जात नाहीत किंवा प्रभावीपणे सीमा तपासणी केली जात नाही. म्हणूनच तस्कर आणि गुन्हेगार सर्रासपणे त्याचा फायदा घेत आहेत.