![HINDU IN BANGLADESH](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/08/HINDU-IN-BANGLADESH--696x447.jpg)
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
जगभरातील ज्यू लोकांच्या सुरक्षेसाठी इस्रायल देश सदैव सक्रिय असतो, त्याप्रमाणे आता भारतानेही जगभरातील हिंदूंच्या हितासाठी सक्रिय होण्याची वेळ आली आहे. भारत ही आशिया खंडातील एक मोठी सत्ता आहे. भारताने आपले आर्थिक आणि लष्करी सामर्थ्य दाखविल्यास बांगलादेश गुडघ्यावर येईल.
बांगलादेशमधील सध्याच्या घडामोडी पाहता पेंद्र सरकारने संयुक्त राष्ट्रांकडे बांगलादेशात शांती सेना (पीस कीपिंग मिशन) तैनात करण्याची विनंती करावी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथे छळ होणाऱ्या भारतीयांना परत आणण्यासंबंधी हस्तक्षेप करावा, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह काही विरोधी नेत्यांनी केली आहे. बांगलादेशात सत्तांतर झाल्यापासून हिंदू अल्पसंख्याकांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतेच चितगाव येथे झालेल्या आंदोलनादरम्यान चिन्मय कृष्ण दास यांच्यासह 19 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी चिन्मय कृष्ण दास यांना अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ हिंसाचार झाला, त्यात त्यांच्या वकिलाचा मृत्यू झाला. आता त्यांना मदत करण्याकरिता कोणीही वकील तयार नाही. भारतीय हिंदू अशी ओळख सांगितल्याने बांगलादेशात गेलेल्या पर्यटक भारतीय युवकाला बेदम मारहाण झाली.
बांगलादेश सम्मिलित सनातन जागरण ज्योतचे प्रवत्ते चिन्मय कृष्णा दास यांना होणारी अटक व नंतर त्यांचा जामीन नाकारण्यात येणे गंभीर आहे. बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर अतिरेकी घटकांकडून झालेल्या हल्ल्यानंतर ही घटना घडली आहे. तिथे अल्पसंख्याकांची घरे आणि व्यावसायिक संस्थांची जाळपोळ आणि लुटमार तसेच चोरी, देवता आणि मंदिरांची विटंबना असे अनेक गुन्हे दाखल आहेत. परंतु या घटनांचे गुन्हेगार अजूनही मोकाट फिरत आहेत, तर दुसरीकडे, शांततापूर्ण सभांद्वारे आपले हक्क मागणाऱ्या धर्मप्रचारकांवर आरोप केले जात आहेत. हे अतिशय दुर्दैवी आहे.
बांगलादेशातील आंतरराष्ट्रीय सोसायटी फॉर कृष्णा चेतना इस्कॉनच्या व्रॅकडाऊनदरम्यान देशाच्या सरकारी बँकांनी हिंदू संघटनेशी संबंधित 17 बांगलादेशी हिंदूंची बँक खाती गोठवली आहेत. बांगलादेशातील अवामी लीगच्या अध्यक्षा आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराचा तीव्र निषेध केला आहे. बांगलादेशातील शेख हसीना यांचे वकील सैफुल इस्लाम यांची झालेली हत्या म्हणजे मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचे शेख हसीना म्हणाल्या आहेत. ब्रिटनचे खासदार बॉब ब्लॅकमन व ब्रिटननेदेखील बांगलादेशात सुरू असलेल्या हिंदूंवरील अन्याय, अत्याचाराविरोधात आवाज उठवला आहे.
बांगलादेशात इस्लामी कट्टरवादाने सत्ता हस्तगत केली. त्यानंतर शेख हसीना यांच्याविरोधातील या आंदोलनाने हिंदूविरोधी जिहादचे रूप घेतले. आतापर्यंत शेकडो हिंदूंच्या सर्रास हत्या करण्यात आल्या असून हजारो हिंदू महिलांवर अत्याचार करण्यात आले आहेत. शेकडो मंदिरेही पाडण्यात आली आहेत. आता तर त्या देशातील ‘इस्कॉन’ या संघटनेला दहशतवादी ठरविण्याचा विचार तेथील सरकार करीत आहे. ही संघटना दहशतवादी असल्याचा महान शोध त्या देशाच्या ‘नोबेल’ सरकारने लावला आहे.
‘इस्कॉन’ ही प्रामुख्याने अमेरिकास्थित धार्मिक संघटना असून ती जगभर भगवद्गीतेचा आणि कृष्णलीलांचा प्रचार व प्रसार करते. अमेरिकेपासून रशियापर्यंत आणि युरोपपासून आफ्रिकेपर्यंत तब्बल 177 देशांमध्ये या संघटनेचे कार्य सुरू असते. काही आखाती देशांमध्येही ही संघटना कार्यरत आहे. या मुस्लिम देशांना ही संघटना दहशतवादी आहे, असा शोध लागलेला नाही, जो दरिद्री आणि भुकेपंगाल बांगलादेशने लावला आहे. ‘इस्कॉन’ ही धर्मादाय संस्था असून तिच्यातर्फे अनेक प्रकारची मोफत मदत दिली जाते. ही संस्था हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करीत असली तरी ती कोठेही धर्मपरिवर्तनाच्या कामात गुंतलेली नाही. यंदा बांगलादेशात आलेल्या पूरस्थितीत याच चिन्मय कृष्ण दासांनी स्वतः अनेक ठिकाणी होडय़ांमधून मदत पोहोचविली होती.
सध्या बांगलादेशामध्ये सत्तापालटामुळे तेथे अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंची अवस्था अतिशय भयावह झाली आहे. प्रतिदिन तेथील हिंदूंच्या हत्या होणे, महिलांवर बलात्कार होणे, देवतांच्या मूर्तींची विटंबना केली जाणे, हिंदूंच्या आध्यात्मिक नेत्यांना अटक केली जाणे या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. तेथे असलेल्या हिंदूंचे रक्षण करणे हे भारताचे नैतिक दायित्व आहे. या विषयावर राष्ट्रीय पातळीवर व्यापक चर्चा होण्याची आवश्यकता आहे. बांगलादेशातील हिंदूंची स्थिती’ दयनीय आहे.
जगाच्या कोणत्याही भागात मुस्लिमविरोधी दंगे झाले, तर जगभरातील मुस्लिम देशांकडून त्याविरोधात एका सुरात आवाज उठविला जातो. अनेकदा संयुक्त राष्ट्रांमध्येही त्याचा निषेध नोंदवला जातो. भारतातील धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आल्याचे बोगस अहवाल वेळोवेळी जारी करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या कथित समित्यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांविरोधात मात्र पूर्ण मौन धारण केले आहे. भारताला म्हणूनच बांगलादेशातील हिंदूंच्या हक्कांवर बोलण्याचा आणि गरज भासल्यास त्या देशात हस्तक्षेप करण्याचा हक्क आहे.
दुर्दैव हेच की, बांगलादेशमधील हिंदू आध्यात्मिक गुरूच्या अटकेविषयी भारतातील पुरोगामी चूप आहेत. गाझा आणि अन्य मुस्लिम राष्ट्रांतील मानवाधिकारांवर ‘सेव्ह गाझा’ वगैरे म्हणून व्यक्त होण्याची चढाओढ लावणारे पुरोगामी, माध्यमांतील पत्रकार या प्रकरणी मात्र चूप आहेत. त्यामुळे मानवाधिकारांच्या नावाखाली अन्याय-अत्याचारांवर व्यक्त होण्याचा हा सोयिस्करपणा सर्वस्वी निंदनीय आहे. त्यामुळे भारत सरकारसह जगभरातील हिंदूंनीही आता चिन्मय कृष्ण प्रभू यांच्या सुटकेसाठी बांगलादेश सरकारवर दबाव वाढवावा.
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचार काळात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी उघडपणे बांगलादेशातील हिंदूंच्या नरसंहाराचा उल्लेख केला होता. ज्याप्रमाणे जगभरातील ज्यू लोकांच्या सुरक्षेसाठी इस्रायल देश सदैव सक्रिय असतो, त्याप्रमाणे आता भारतानेही जगभरातील हिंदूंच्या हितासाठी सक्रिय होण्याची वेळ आली आहे. भारत ही आशिया खंडातील एक मोठी सत्ता आहे. भारताने आपले आर्थिक आणि लष्करी सामर्थ्य दाखविल्यास बांगलादेश गुडघ्यावर येईल.