ईव्हीएमची पडताळणी; 45 दिवस थांबा, जिल्ह्यातील अकरा विधानसभा उमेदवारांचे अर्ज

विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या जिल्ह्यातील 11 उमेदवारांनी ईव्हीएमवरील मतांची पडताळणी आणि मोजणी करण्यासाठी पैसे भरून अर्ज केले आहेत. या उमेदवारांना अर्ज केल्यापासून 45 दिवस पडताळणीसाठी वाट पाहावी लागणार आहे. निवडणूक आयोगाकडून या उमेदवारांना त्यांनी निवड केलेले मतदान केंद्र आणि त्याची पडताळणी करण्यासाठी 45 दिवसांनंतर स्वतंत्रपणे तारीख आणि वेळ दिली जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, (हडपसर), योगेंद्र पवार (बारामती), अशोक पवार (शिरूर), रमेश बागवे (कॅन्टोन्मेंट बोर्ड), सचिन दोडके (खडकवासला) यांच्यासह अकरा पराभूत उमेदवारांनी मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज केले आहेत. त्यासाठी प्रत्येक मतदान यंत्रासाठी ४७ हजार रुपये शुल्कदेखील त्यांनी भरले आहे. मात्र, अर्ज केल्यानंतर 45 दिवसांनी निवडणूक आयोगाकडून अर्जावर निर्णय दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मतमोजणी पडताळणीसाठी केलेल्या अर्जाचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठवला आहे. एकूण 11 विधानसभा मतदारसंघांमध्ये पराभूत उमेदवारांनी अर्ज केल्यामुळे या प्रत्येक मतदारसंघात स्वतंत्रपणे अधिकारी नेमून त्या केंद्रामधील ईव्हीएममधील मतांची फेर पडताळणी केली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी आणखी सव्वा महिना वाट पाहावी लागणार आहे.

मतांचा डाटा डिलीट करून बटणे दाबणार

■ मतदान यंत्र म्हणजे ईव्हीएममध्ये जमा झालेली मते मोजली जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्जामध्ये मतदान केंद्र आणि मतदान यंत्राची निवड केली आहे, त्या यंत्रामधील संपूर्ण मतांचा डाटा डिलीट केला जाईल. त्यानंतर त्याच मतदान यंत्रावर चिन्हाचे बटण एकूण बाराशे वेळा दाबून त्या बटणांचे एकूण मतदान मोजले जाईल.