Maharashtra election 2024 – ठाण्यात केळकर यांच्या वाटेत मिंध्यांचे काटे; माजी नगरसेवक संजय भोईर अपक्ष लढणार

मिंधे गटाच्या विरोधात वारंवार आवाज उठवणारे ठाण्यातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्या विरोधात मिंध्यांनी शड्डू ठोकायला सुरुवात केली आहे. एकीकडे भाजपने ठाणे शहर विधानसभा निवडणुकीत संजय केळकर यांना पुन्हा संधी दिली असताना केळकर यांच्या वाटेत मिंध्यांनी काटे रोवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, घोडबंदरचे माजी नगरसेवक संजय भोईर अपक्ष निवडणूक लढणार असल्याने भाजप आणि मिंधे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघातील निकृष्ट दर्जाची कामे, विकासकामामधील भ्रष्टाचार आणि पालिकेच्या मुजोर अधिकाऱ्यांविरोधात अधिवेशनात केळकर यांनी सतत आवाज उठवला असल्याने केळकर यांना विधानसभा निवडणुकीत अपशकुन करण्यासाठी मिंधे गटाने व्यूहरचना केली आहे. संजय केळकर यांना पुन्हा संधी दिल्याने शिंदे गटात नाराजीचा सूर असून घोडबंदर येथील भोईर कुटुंबाने यंदा केळकर यांना मदत न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही परिस्थिती आम्ही ठाणे शहर विधानसभा लढवणारच या भूमिकेवर संजय भोईर ठाम आहेत. त्यामुळे मिंधे आणि भाजपात वादाचे फटाके फुटू लागले आहेत.

बाकडे वाटण्यापलीकडे केळकरांनी काय केले?

गेल्या 10 वर्षांत केळकर यांनी ठाणे शहरासाठी कोणतीच हवी तशी विकासकामे केली नाहीत. कचराकुंडी वाटप, बाकडे वाटप यापलीकडे ठोस अशी कोणतीच कामे दिसत नाहीत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत घोडबंदरवासीयांना बदल हवा असल्याने आम्ही अपक्ष लढणार असल्याचा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया संजय भोईर यांनी दिली. दरम्यान, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनीदेखील आज ठाणे शहर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेतल्याने केळकरांच्या वाटेत जाणीवपूर्वक काटे पेरण्यासाठी मिंध्यांनीच षडयंत्र केले आहे की काय, अशी चर्चा केळकर समर्थकांमध्ये आहे.

मुंब्यातील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी वाजवली ‘तुतारी’

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने कळवा-मुंब्यात अजित पवार गटाला जोरदार धक्का दिला आहे. माजी नगरसेवक मिराज खान यांच्यासह पदाधिकारी बिलाल शेख (जसबीर) आणि राजनाथ यादव यांनी तुतारी हाती घेतली आहे. माजी महापौर नईम खान यांनी काही दिवसांपूर्वीच ‘तुतारी’ वाजवल्याने ठाण्यात अजित पवार गटाला जोर का झटका बसला आहे. नजीब मुल्ला यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याने कळवा – मुंब्यात गेल्या काही महिन्यांपासून पक्ष फोडाफोडीला सुरुवात झाली होती. माजी महापौर नईम खान, त्यांचे चिरंजीव व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक मिराज खान यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. बिलाल शेख (जसबीर) यांनीही अजित पवार गटात प्रवेश केला होता. पण काही महिन्यांतच नईम खान, मिराज खान, राजनाथ यादव, जसबीर यांनी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आव्हाडांनी अजित पवार गटाला धक्का दिल्याचे बोलले जाते.

भिवंडी ग्रामीणमध्ये वाढलेले तीन लाख मतदार ठरणार निर्णायक

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात तब्बल 3 लाख 36 हजार 129 मतदारांची नोंद झाली असून यामध्ये 1 लाख 73 हजार 443 पुरुष 1 लाख 62 हजार 608 स्त्री, 11 इतर व 67 सैनिक मतदार आहेत. हे वाढलेले मतदारच भिवंडी ग्रामीणमध्ये निर्णायक ठरणार आहेत. भिवंडी ग्रामीण विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब अंधारे, भिवंडी पंचायत समिती गटविकास अधिकारी गोविंद खामकर, वाडा पंचायत समिती गटविकास अधिकारी वैभव शिंदे उपस्थित होते. भिवंडी ग्रामीण हा अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ असून या मतदारसंघात 231 ठिकाणी मतदान केंद्र बनविण्यात आले आहेत. यामध्ये भिवंडी तालुक्यातील 283 व वाडा तालुक्यातील 68 मतदार केंद्रांचा समावेश आहे.