भाजपकडून विशिष्ट धर्माच्या लोकांना जाणीवपूर्वक लक्ष्य, खासदार वर्षा गायकवाड यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

धारावीकरांचा उपयोग करून मुंबईत व्होट जिहाद केला जात आहे असे विधान भाजप नेते आशिष शेलार यांनी केले होते. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी शेलार यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. तसेच निवडणूक आयोगाने शेलार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

 

गायकवाड यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून म्हटले आहे की, राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेते व्होट जिहाद असा शब्दप्रयोग करून एका विशिष्ट धर्माचा अपमान करत आहेत. निवडणुकीत कोणी कोणाला मतदान करायचे हा त्या मतदाराचा अधिकार आहे. जर एखा‌द्या मतदाराने किंवा काही भागातील बहुसंख्य मतदारांनी मतदान केले असेल तर त्याला व्होट जिहाद म्हणण्याचा कोणालाही अधिकार नाही. संविधानाने मतदाराला दिलेल्या हक्क व अधिकाराचे हे उल्लंघन आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या एका पत्रकार परिषदतच व्होट जिहाद सारखे विधाने केल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल असे आपण जाहीर केले होते. भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष श्री. आशिष शेलार यांनी दिनांक 19 ऑक्टोबर 2024 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, “धारावी पुनर्विकासाचा उपयोग करून तिथल्या रहिवाशांची माथी भडकवून, धारावीकरांचा उपयोग करून मुंबईत व्होट जिहाद केला जात आहे.” असे विधान केले आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते अशा पद्धतीने विशिष्ट धर्माच्या लोकांना जाणीवपूर्वक टार्गेट करत आहेत. संविधानाने त्यांना दिलेल्या मतदानाच्या हक्कावर गदा आणत आहेत. अशा प्रकारे विधान करून भाजपा धार्मिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. श्री. आशिष शेलार यांच्या विधानाची आपण गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी विनंती गायकवाड यांनी केली आहे.