महापालिकेची तिजोरी भरण्याच्या नावाखाली मुंबईच्या जमिनी बिल्डरच्या घशात घालणार आहेत! मिंधे-भाजपवर आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे-भाजपवर हल्लाबोल केला आहे. धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मिंधे सरकारने मुंबईतील 1080 एकर जमीन अदानीच्या घाशात फुकटात घातल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी बुधवारी केला होता. आता मुंबईच्या जमिनीवरून पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी मिंधे-भाजपवर हल्लाबोल केला आहे. गद्दार एकनाथ शिंदे ह्यांची मजा आणि मुंबईकरांना सजा, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून भाजप-मिंधे सरकारच्या भ्रष्ट कारभारावर आसुड ओढले आहेत. कॉन्ट्रेक्टर मंत्री (CM) ने आवडत्या कॉन्ट्रॅक्टर्सना कामं दिली आहेत. कॉन्ट्रॅक्टर्सने महापालिकेला लूटलं, पैसे काढले, पण कामं झालीच नाहीत, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आता मुंबई महापालिकेची तिजोरी संपल्यावर तीच तिजोरी भरण्याच्या नावाखाली मुंबईच्या जमिनी बिल्डरच्या घशात घालणार आहेत. आणि ह्या जमिनी जाणार मात्र कमी किमतीत. म्हणजे गद्दार एकनाथ शिंदे ह्यांची मजा आणि मुंबईकरांना सजा, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तिजोरी रिकामी, जमिनी बिल्डरच्या घश्यात. सुरतेच्या लुटीचा बदला, भाजप एकनाथ शिंदेंना हाताशी घेऊन घेत आहे, असा हल्लाही आदित्य ठाकरे यांनी चढवला.