मुंबईत आज-उद्या 10 टक्के पाणीकपात, वैतरणा जलवाहिनीच्या झडपेमध्ये बिघाड

मुंबईला पाणीपुरवठा होणाऱया वैतरणा जलवाहिनीच्या 900 मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाल्यामुळे संपूर्ण मुंबईत उद्या गुरुवार आणि शुक्रवारी 5 ते 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबई शहर व उपनगरास मुख्यत्वे वैतरणा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणामधून पाणी वाहून नेणाऱया वैतरणा जलवाहिनीवरील यंत्रणेमधील ताराळी येथे 900 मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी धरणामधून पाणी वाहून नेणारी यंत्रणा अंशतः बंद करण्यात आली आहे. परिणामी, मुंबई पालिका कार्यक्षेत्रात पाणी पुरवठा करणाऱया भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास होणाऱया पाणीपुरवठय़ामध्ये 5 ते 10 टक्के घट होणार आहे. या दुरुस्ती कामासाठी सुमारे 48 तास इतका कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत दोन दिवस 5 ते 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे.