300 बस अनफिट; तरीही विद्यार्थ्यांचा प्रवास सुसाट, अहिल्यानगरमध्ये स्कूल बस धोरणाला हरताळ

प्रातिनिधीक फोटो

राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्कूल बस धोरण लागू केले. या धोरणाला अहिल्यानगर प्रादेशिक परिवहन विभागातील शहरासह सात तालुक्यांत हरताळ फासण्यात आल्याचे दिसून येत आहे. अहिल्यानगर विभागातील 530 स्कूलबसपैकी 230 बसला फिटनेस प्रमाणपत्र असून, इतर 300 बस अनफिट असतानाही विद्यार्थ्यांचा प्रवास सुसाट सुरू आहे. याबाबत पालक मात्र अनभिज्ञ आहेत.

राज्यभरात स्कूल बस अपघाताच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने स्कूल बस सुरक्षा धोरण ठरविले, त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व शाळांना दिले. मात्र, बहुतांशी शाळांच्या व्यवस्थापनाने स्कूल बसचे धोरण कागदावर ठेवले आहे. किमान तीन किलोमीटर अंतर असलेल्या शाळांतून विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यासाठी स्कूल बस सक्तीची केली. बसची व्यवस्था करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि बसमालक यांच्यात करार करावा लागतो. संभाव्य इंधन दरवाढ झाल्यास दरात वाढ करण्याची परवानगी असते.

सरासरी तीन किलोमीटरपर्यंतच्या अंतरासाठी एका विद्यार्थ्याला पाचशे रुपये शुल्क आकारले जाते. तसेच काही स्कूल बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त भरले जातात. आरटीओकडून प्रत्येक वर्षी स्कूल बसची तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.

या तपासणीच्या वेळेस चालकाचा परवाना, वाहनाचा विमा, प्रदूषण होत नसल्याबद्दल पीयूसी प्रमाणपत्र, आग प्रतिबंधक सिलिंडर, आपत्कालीन दरवाजा, बसमधून प्रवास करणाऱया विद्यार्थ्यांचा रक्तगट, पत्ता, संपर्क क्रमांक आदी रेकॉर्ड, वाहन सुस्थितीमध्ये असल्याची खात्री मोटार वाहन निरीक्षक करतात. त्यानंतर फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते. शैक्षणिक वर्षाला सुरुवात होण्याअगोदर हे प्रमाणपत्र आहे का, याची शाळा व्यवस्थापन समितीने खात्री करणे गरजेचे आहे. मात्र, शाळा व्यवस्थापन पालक व व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष झाले आहे.

तसेच वाहनचालकांनी वाहन परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, इन्शुरन्स काढावा; अन्यथा 25 हजारांचा दंड वाहनचालकांना भरावा लागणार आहे. बसमध्ये प्रतिबंधक सिलिंडर, स्पीड गव्हर्नर, आपत्कालीन दरवाजा, अटेंडन्सची सुविधा आदी सर्व बाबींची पूर्तता केली जाते.

या प्रमाणपत्रानंतर बसमध्ये सुविधा आहेत का, यावर पालकांनी लक्ष ठेवले पाहिजे. या सुविधा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आहेत. ज्या बसचालकांनी फिटनेस प्रमाणपत्र घेतले नाही, त्यांनी लवकरात लवकर करून घेणे आवश्यक आहे.

– विनोद सगरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अहिल्यानगर