परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळली, वाहतुकीचा खोळंबा

मुंबईसह कोकणामध्ये परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. याचा फटका मुंबई-गोवा महामार्गाला बसला असून परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसलळी आहे. त्यामुळे घाटातून होणारी वाहतुक विस्कळीत झाली असून या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनांना वाहतुक कोडींचा सामना करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (16 ऑक्टोबर 2024) सकाळी पाच वाजता भिंत कोसळल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच चिपळून पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. भिंत कोसळल्यामुळे घाटाच्या पायथ्याला असणाऱ्या पेढे गावाला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे पावसाला सुरुवात झाली तेव्हाच घाटात मोठी दरड कोसळली होती. त्यामुळे तेव्हा सुद्धा एकाबाजून मार्ग सुरू ठेवला होता. तेव्हा कोसळलेली दरड अद्याप हटविण्यात आलेली नाही. आता त्याच ठिकाणी काही अंतरावर पुन्हा भिंत कोसळल्याने प्रशासनाचा हलगर्जीपणा उघडकीस आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मागील काही महिन्यांपासून अनेक वेळा परशुराम घाटात भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने याठिकाणावरील पाचशे मीटरपर्यंतचा परिसर धोकादायक म्हणून घोषित केला आहे. तसेच याठिकाणची एकेरी वाहतुक सुद्धा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना वाहनांना वाहतुक कोडींचा सामना करावा लागत आहे.