प्रचारासाठी मिंधेची सरकारी तिजोरीतून उधळपट्टी, कंत्राटदारांची 40 हजार कोटींची बिलं थकली!

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती सरकार एकामागोमाग एक योजना जाहीर करत आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला असून वित्त विभागानेही चिंता व्यक्त केली आहे. आता तर सरकारकडे कंत्राटदारांची बिलं देण्यासाठीही पैसा नसल्याचे समोर आले आहे. कंत्राटदारांची जवळपास 40 हजार कोटींची बिलं थकली आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यावरून विरोधी पक्षाने सरकारवर जोरदार टीका केली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात ते म्हणतात, कुठे गेली ती आर्थिक शिस्त? राज्यातील कंत्राटदारांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे. महायुती सरकारच्या आर्थिक बेशिस्त कारभारामुळे राज्यातील कंत्राटदारांची तब्बल 40 हजार कोटींची बिल थकली आहेत.

कंत्राटदार आणि आणि अभियंता संघटनांनी पाच वेळा आठवण करून देऊनही या सरकारने बिल चुकती केली नाही. स्वतःच्या प्रचारासाठी सरकारी तिजोरीतून उधळपट्टी सुरू आहे, पण काम करणाऱ्या कंत्राटदारांची बिल द्यायला तिजोरीत पैसे नाही. मला खूप आर्थिक शिस्त आहे, मी खूप आर्थिक शिस्त पाळून काम करतो निर्णय घेतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार सगळीकडे सांगतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

हे सरकार जाता जाता महाराष्ट्राची तिजोरी रिकामी करून महाराष्ट्राला खड्ड्यात घालत आहेत. ती आर्थिक शिस्त आता कुठं गेली? सरकारी तिजोरीतून कोण उधळपट्टी करत आहे हे महाराष्ट्र समोर यायला हवे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

रोहित पवार यांचा सरकारवर निशाणा

बंडखोर आमदारांना सांभाळण्यासाठी तसेच दलालीसाठी सरकारने कुठल्याही आर्थिक बाबींचा विचार न करता दणादण टेंडर काढले परिणामी जून महिन्यात असलेली विकासकामांच्या रखडलेल्या बिलांची 18 हजार कोटींची उधारी आता तब्बल 40 हजार कोटींवर पोहचली आहे. एकंदरीतच सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे राज्याची दिवाळखोरीकडे वाटचाल होत आहे, आज बिले थांबली आहे, उद्या पगार थांबतील. राज्य सरकारची ही उधारी बघता सरकार सध्या करत असलेल्या वेगवेगळ्या विकासकामांच्या घोषणा म्हणजे निवडणुका समोर ठेवून दाखवण्यात येत असलेले #lolypop च म्हणावे लागेल. असो अर्थखात्याचा दीर्घ अनुभव असणारे अजित दादा, त्यांच्या फाईल चेक करणारे देवेंद्र फडणवीस यांची जोडी अर्थखात्याचे नेतृत्व करत असताना राज्यावर दिवाळखोरीची परिस्थिती ओढवत आहे याचे मात्र नक्कीच आश्चर्य वाटते, असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले.