मुंबई-अहमदाबाद मार्गावर मुले चोरणारी टोळी जेरबंद, दोन चिमुकल्यांची सुटका

चिमुकल्यांचे अपहरण करून त्यांना गुजरात येथे नेत असतानाच मुलं चोरणाऱ्या टोळीवर पोलिसांनी झडप घातली. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी परिसरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन चिमुकल्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. कासा पोलिसांनी कारवाई करत सहा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

चारोटी परिसरात हाणामारी सुरू असल्याची माहिती कासा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाद मिटवला. मात्र यावेळी पोलिसांना सदर गाडीत दोन लहान मुले दिसली. पोलिसांनी या चिमुकल्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला.

आपल्याला रेल्वे स्थानकावरून आरोपींनी उचलून आणल्याचे चिमुकल्यांनी पोलिसांना सांगितले. सत्यम मिश्रा (7) आणि सूरज मिश्रा (9) अशी अपहरण करण्यात आलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. मुलांच्या माहितीनंतर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली.

दरम्यान, चौकशीत मुलांच्या अपहरणाबाबत कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. कासा पोलिसांनी आरोपींना महात्मा फुले पोलिसांच्या स्वाधीन केले. तर दोन्ही लहान मुलांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले.