भाई, दादा आणि भाऊंच्या सरकारमध्ये राज्यातील लेकीबाळी सुरक्षित नाहीत ; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

लाडकी बहीण योजनेसाठी सर्व विकासकामे रखडवून सर्व खात्यांचा निधी या योजनेकडे वळवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यासमोर गंभीर आर्थिक संकट ओढवण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तरी त्याकडे दुर्लक्ष करत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री योजनेचे श्रेय घेण्यासाठी धडपडत आहेत. आपणच बहिणींचे भाऊ आहोत, हे दाखवण्याची त्यांच्यात चढाओढ लागली आहे. मात्र, पुण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेकडे त्यांचे लक्षही गेले नाही. यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीसाठी भाई, दादा आणि भाऊ म्हणून स्वतःची ब्रॅण्डिंग करून घेण्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व्यस्त आहे. अणि दुसरीकडे मागील दोन दिवसात पुण्यातून महिला अत्याचाराच्या धक्कादायक घटना पुढे येत आहे. ब्रॅण्डिंग मध्ये व्यस्त असलेले आणि २४ तास प्रत्येक चौकात बॅनर वर दिसणारे भाई, दादा आणि भाऊंच्या सरकार मध्ये राज्यातील लेकी बाळी सुरक्षित नाही.

पुण्यातील एका शालेय मुलीवर अत्याचार झाले, तर एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला. परंतु पुण्याचे पालकमंत्री असलेले दादा काही बोलायला तयार नाही. पहाटे लवकर उठून दादा काय काम करतात? पुण्याचे दादा पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्या, लेकी बाळीना न्याय द्या… सुरक्षा द्या.असे वडेट्टीवार यांनी पोस्टमध्ये म्हणत राज्यातील महिलांना न्याय आणि सुरक्षा द्या अशी मागणी केली आहे.