नेपाळमध्ये पावसाचा हाहाकार, 112 ठार; कोसीची पाणीपातळी वाढल्याने बिहारही जलमय, 56 वर्षांचा रेकॉर्ड मोडला

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. शुक्रवारपासून कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे भूस्खलनाच्या घटनाही घडत आहेत. यात आतापर्यंत 112 जणांचा मृत्यू झाला असून, 66 लोक बेपत्ता आहेत. पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येत आहे. दरम्यान, नेपाळमधील पुराचा फटका हिंदुस्थानमधील बिहार या राज्यालाही बसला आहे.

नेपाळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोसी नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. रविवारी पहाटे 5 वाजेपर्यंत कोसी बॅरेज वीरपूर येथून 6 लाख 61 हजार 295 क्युसेक पाणी सोडण्यात आले असून जलविसर्गाचा 56 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला गेला आहे. याआधी 1968 मध्ये कोसी नदीमध्ये सर्वाधिक पाणी सोडण्यात आले होते.

शनिवारी सायंकाळी कोसी बॅरेज पूल पाण्याखाली गेला होता. आगामी काळामध्ये कोसी बॅरेजमधून 16 लाख क्यूसेकपर्यंत पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. कोसी, गंडक आणि गंगा नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे 13 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळ विभागातील कोसी नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गत 24 तासात 200 मिमीहून अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे कोसी नदीची पाणीपातळी सातत्याने वाढत आहे. नेपाळने कोसी आणि गंडक बॅरेजमधून 10.5 लाख क्युसेक पाणी सोडले आहे. हे पाणी बिहारमध्ये पोहोचले असून सीमेजवळील अनेक भाग जलमय झाले आहेत.

सरकार अलर्ट

बिहारमध्ये पूरपरिस्थितीचे संकट पाहता राज्य आणि केंद्र सरकार अलर्ट झाले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय हे एनडीआएफची बैठक घेणार आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफला अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.