सरकार येईल की नाही माहित नाही, पण आठवले पुन्हा मंत्री होतील; गडकरी यांची गॅरंटी

आमचे सरकार पुन्हा येण्याची गॅरंटी नाही. मात्र सरकार कुणाचंही आलं तरी रामदास आठवले पुन्हा मंत्री होतील याची गॅरंटी असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. नागपुरात आयोजित एका पुरस्कार वितरण सोहळ्यात गडकरी बोलत होते.

नागपुरात मारवाडी फाऊंडेशनतर्फे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी रामदास आठवले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आतापर्यंत तीन वेळा मंत्रीपद मिळाले आणि चौथ्यांदा सरकार आल्यानंतर आपण मंत्री होणारच असे ठामपणे सांगितले.

आठवले यांच्या वक्तव्यावर नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात प्रतिक्रिया दिली. आपल्या भाषणात बोलताना गडकरी यांनी आम्हाला चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी नाही. मात्र रामदास आठवले यांना सरकार येऊन ते मंत्री होण्याची गॅरंटी आहे. सरकार कोणाचेही आले तरी आठवले यांचे मंत्रिपद पक्के आहे, असे म्हटले आहे.

रामदास आठवले हे राजकारणातील हवामान शास्त्रज्ञ असून त्यांना हवा कुठल्या दिशेने चालते याचा अंदाज येतो, असे म्हणत गडकरींनी आठवलेंना कोपरखळी मारली आहे. रामदास आठवलेंना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आयुष्य आणि निरोगी जीवन प्राप्त व्हावं अशी मी प्रार्थना करतो. आठवलेंनी त्यांचं आयुष्य दलित, पीडित, शोषित माणसांसाठी दिलेलं आहे. या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन करण्यात ते यशस्वी होतील, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला आहे.