कोकणातील MIDCच्या घोषणांची CID चौकशी करा, भाजपच्या माजी आमदाराच्या मागणीने खळबळ

महाराष्ट्राच्या उद्योगमंत्र्यांचा हेतू शुध्द नाही. संकट तयार करायचे आणि ते संकट मी दूर केले असे दाखवायचे, अशी त्यांची स्टाईल आहे. जमीनमालकाचा नव्हे तर फक्त गुंतवणूकदारांचा फायदा करून देण्यासाठी एमआयडीसीच्या घोषणा होत आहेत. हे नक्की काय सुरु आहे, याचा तपास करण्यासाठी कोकणातील एमआयडीसीच्या घोषणांची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी केल्यामुळे उद्योगखात्यात खळबळ उडाली आहे.

माजी आमदार बाळ माने पुढे म्हणाले की, मिऱ्या गावातील ग्रामस्थांना थेट नोटीसा आल्या. कोणताही वारस तपास केलेला नाही. आता बोंबाबोंब झाल्यानंतर उद्योगमंत्री गाववाल्यांशी बोलणार आहेत. तुम्ही चारवेळा याच मतदार संघात निवडून आलात तेव्हा जनतेची कदर करायला पाहिजे होती, असा सल्ला माजी आमदार बाळ माने यांनी दिला आहे.

मिऱ्या गावात वनौषधी आहेत. त्यामुळे लॉजिस्टिक पार्क त्याठिकाणी सोयीचे नाही. स्थानिकांना रोजगार देणारी भारती शिपयार्ड बंद पडली. त्यावेळी त्या कंपनीची काळजी केली नाही. आज जे. के. फाईल्स कंपनी बंद पडली. निवडणुका आल्या की घोषणा केल्या जातात. गेल्या 20 वर्षात स्थानिक आमदारांनी केलेल्या घोषणांवर एक ग्रंथ तयार होईल असा टोलाही बाळ माने यांनी उदय सामंत यांना लगावला आहे.