सोमय्या भ्रष्टाचारी पकडून आणतात अन् फडणवीस त्यांना पक्षात घेतात, जरांगे पाटील यांचे पुन्हा भाजपवर टिकास्त्र

सरकार कसे बनवायचे हे फडणवीसांना माहित आहे. किरीट सोमय्या भ्रष्टाचारी पकडून आणतात आणि फडणवीस त्यांना पक्षात घेतात. फडणवीस माणुसकी जिवंत करा आणि आरक्षण द्या, नाही तर तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. बीड येथील घोंगडी बैठकीत ते बोलत होते.

आज बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित भाषणात जरांगे यांनी पुन्हा फडणवीस यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, भाजपतील मराठा आता फडणवीस यांच्यापासून दूर चालला आहे. भाजपच्या माजी आमदारांची रांग लागत आहे. त्यांचे आमदार रात्रीच भेटायला येतात. भाजपमध्ये लवकरच मोठा स्फोट होणार असा दावा त्यांनी केला. भाजपच्या पुण्यातील एका नेत्याने तर फ्लॅट विकला पण त्याला तिकीट मिळणार नाही, असे ते म्हणाले.

बीडच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत केलेली पाडापाडी योग्य होती. जनतेला प्राधान्य देणारा हा जिल्हा आहे. आधी जात आणि नंतर पक्ष, जातीला पाठ दाखवून मागे फिरायचे नाही, असेही त्यांनी बजावले.