छत्रपती शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेप्रकरणी अखेर पंतप्रधान मोदींनी मागितली माफी

सिंधुदुर्गमधील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रात संतापची लाट उसळली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मालवणमध्ये मोर्चा काढत या घटनेवरून राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारचा निषेध केला. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शिवपुतळा दुर्घटनेप्रकरणी जनतेची माफी मागितली आहे.

पालघरमध्ये वाढवण बंदराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत आले होते. वाढवण बंदराच्या भूमिपूजन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण झाले. या भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदी यांनी मालवणमधील शिवपुतळा दुर्घटनेचा उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराज… हे आमच्यासाठी फक्त एक नाव नाही तर, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. आणि आज आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणात नतमस्तक होऊन माफी मागतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.