गुलाब पाटलांना टपरीवर बसवायचं की जेलमध्ये, फाईल तयार आहे!

‘वादळ, पाऊस शिवसैनिकाला थांबवू शकत नाही. त्यामुळे कालचा टपरीवाला आपल्याला काय थांबवणार? टपरीवर बसवायचं की जेलमध्ये बसवायचं? व्यवस्थित अभ्यास करून फाईल तयार केलेली आहे. ज्या ईडीला घाबरून तुम्ही तिकडे पळाले, असं सांगतात. तीच ईडी तुमच्याकडे येणार आहे, तुम्हाला कोणीच वाचू शकणार नाही’ असा घणाघात शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज धरणगावात केला.

धरणगाव येथील जी.एस. कॉटन येथे शिवसेना नेते संजय सावंत यांच्या उपस्थितीत शिवसंवाद मेळावा झाला. यावेळी संबोधित करताना खासदार संजय राऊत म्हणाले, जे गद्दार तिकडे पळाले, ते ईडीकडून वाचणार नाहीत. ईडीची फाईल बंद होत नाही, ती टेबलावरून कपाटात जाते. आमचं सरकार आले की अनेक फायली कपाटातून टेबलावर येणार आहेत. जे गद्दार तिकडे पळाले, ते ईडीकडून वाचणार नाहीत. या गुलाबरावांना आता त्या गुलाबरावांसाठी डबा घेऊन जावे लागेल. जळगाव जिह्यात गद्दारीचे अडीचशे कोटी आले. यांना कोणी शाखाप्रमुख केलं नसतं. मातीतून उचलून शिवसेनेने मोठे केले आहे. मात्र हे शिवसेनेसोबत बेईमान झाले. पाणी खात्याचे मंत्री आपल्या मतदारसंघांमध्ये पंधरा पंधरा दिवस पाणी देऊ शकत नाही. त्यांना मिळणारे संध्याकाळचे पाणी कोणत्या ठिकाणाहून येते ते टक्केवारीचे पाणी आहे असे म्हणतात.

ज्या जागा शिवसेनेच्या होत्या त्या आपण लढायलाच हव्या आणि जिंकायला हव्या. उत्तर महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. जळगाव जिह्यातल्या पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या घरात जाऊन त्याचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न केलेला नाही. शिंदे मुख्यमंत्री कमी आणि दिल्लीचे लाचार जास्त आहेत. महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या चरणी गहाण टाकला आहे. तुम्हाला मंत्री म्हणून रोजगार मिळाला. तुमच्याकडे पाणी खातं आहे, पाण्यासारखा पैसा आहे. डांबर, माती, वाळू अशा सर्व ठिकाणाहून तुम्ही पैसे खात आहात असा आरोप संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर नाव न घेता केला.

लोकसभेचा निकाल काय लागला ते विसरून जा. या जिह्यामध्ये लोकसभेत भाजपची जवळपास दोन लाख मतं कमी करण्याचे काम आपण केलं आहे. या जळगाव जिह्यातल्या सर्व जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे. ज्या जागा शिवसेनेच्या आहेत, त्या जागा शिवसेना जिंकणार, असंही राऊत म्हणाले.