रेसकोर्सची जागा मुंबईकरांचीच राहिल, आदित्य ठाकरे यांची ग्वाही; मिंधे सरकारला देखील फटकारले

महालक्ष्मी येथील रेसकोर्सची 120 एकर जागा पालिकेच्या ताब्यात आल्यामुळे या ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून न्यूयॉर्कच्या धर्तीवर मुंबई सेंट्रल पार्क होणार आहे. या ठिकाणी कोणतेही बांधकाम होणार नसले तरी 120 एकर जागेचा वापर आता नव्या कारणासाठी होणार असल्याने पालिकेने आरक्षण बदलाबाबत आज हरकती-सूचना मागवल्या आहेत. त्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत मिंधे सरकारला फटकारले आहे. तसेच ‘रेसकोर्सची जागा मुंबईकरांचीच राहिल’, अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी जनतेला दिली आहे.

”या प्रकरणाचा मी जानेवारी महिन्यात भंडाफोड केला होता. मिंधे भाजप सरकारला रेसकोर्सच्या मोकळ्या जागेत बांधकाम करायचे आहे. मला सर्वांना हे स्पष्टपणे सांगायचे आहे की आमचे सरकार आल्यावर रेसकोर्सला विभागणारा प्रोजेक्ट आम्ही बंद करणार. तसेच रेसकोर्सचे ते मेंबर्स ज्यांनी मिंधे सरकारला क्लब हाऊससाठी रेसकोर्सची जमीन देण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे. त्या सभासदांची देखील चौकशी करण्यात येईल. मुंबईतील कोणत्याही मोकळ्या जागांवर आम्ही बांधकाम करू देणार नाही. ही जागा मुंबईकरांची आहे आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम झाले नाही पाहिजे. मिंधे भाजप सरकारचा मुंबईतील इतरही खुल्या जागांवर डोळा आहे”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

मुंबई महानगरपालिका रेसकोर्सवर कोणतेही बांधकाम न करता अद्ययावत सुविधा असणारे भव्य मुंबई सेंट्रल पार्क तयार करणार आहे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबकडून 120 एकर जागा पालिकेच्या ताब्यात आल्यामुळे आता सेंट्रल पार्कचा आराखडा तयार करण्यात येत आहे. यामध्ये रेसकोर्सची 120 एकर आणि कोस्टल रोडची सुमारे 180 एकर जागा मिळून एपूण 300 एकर जागेवर संपूर्ण हिरवळीसह, चालण्यासाठी आणि बसण्यासाठी जागा आदी सुविधा तयार करण्यात येतील. मात्र रेसकोर्सच्या 120 एकर जागेवर असलेले आरक्षण बदलणार असल्याने हरकती-सूचना मागवल्या असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे