मुख्यमंत्र्यांचा खोटेपणा जगजाहीर होतोय, ‘त्या’ क्लीपवरून आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

राज्यात वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरून संतापाची लाट उसळलेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र भर सभेत खुलेआम जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेत आहेत. खुद्द मुख्यमंत्रीच दोन महिन्यात एका आरोपीला फाशी दिल्याचे सांगत फेक नरेटीव्ह सेट करत आहेत. मुख्यमंत्र्यांचा खोटेपणा आम्हाला माहिती होता आणि आता तो जगजाहीर होत आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. महाराष्ट्र स्वाभिमान सभेनिमित्त येवला येथे आले असता आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

बदलापूरचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे भाजपचा आमदार म्हणाले. मुख्यमंत्र्यांनीही त्याचा कित्ता गिरवला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दोन महिन्यांपूर्वी अशाच एका प्रकरणात आरोपीला फाशी दिल्याचे म्हटले. खरेतर फाशीसारखा निकाल फार मोठा असतो. आरोपी राष्ट्रपतींपर्यंत अपील करू शकतो. त्याची देशभरात चर्चाही होते. पण मुख्यमंत्री खोटे बोलले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट करावे की कोणाला फाशी दिली? कोणत्या खटल्यात दिली? कधीचा खटला होता? कुठे फाशी दिली? ते खोटे बोलत असून आम्हाला त्यांचा खोटेपणा माहिती होता. आता तो जगजाहीर होत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच जोपर्यंत केंद्र सरकार किंवा राष्ट्रपतींकडून शक्ती कायदा पास होत नाही तोपर्यंत अशीच परिस्थिती राहील, असेही ते म्हणाले.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी पोलिसांकडून आंदोलकांवर सुरू असलेल्या कारवाईवरूनही संताप व्यक्त केला. महिला सुरक्षेसाठी कुणी आंदोलन झाले. 3-4 वर्षाच्या मुलींवर अत्याचार झाले आणि त्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. 300 लोकांना आत टाकले, हा कुठला न्याय? या आंदोलकांची अशी परेड केली जणून त्यांनीच बलात्कार केला. देशात भाजपनेच अशी प्रथा पाडली आहे. बिल्किस बानो प्रकरणात जात, पात, धर्म न पाहता ती एक महिला होती हे पाहायला हवे होते. पण तिच्या बलात्काऱ्यांचे स्वागत करण्यात आले, त्यांचे औक्षण करण्यात आले, त्यांना प्रचारात फिरवण्यात आले. त्यांच्याकडून काय न्यायाची अपेक्षा करणात. हजारो महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्ज्वल रेवन्नाच्या प्रचाराला मोदी आले, त्यांच्याकडून काय अपेक्षा करता, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, घटनाबाह्य मुख्यमंत्री प्रत्येक गोष्टीत राजकारण बघतात. खरे तर त्यांनी समोर येऊन उत्तर द्यायला हवे होते. पण ते स्वत: फार्महाऊसवर निघून गेले. गृहगमंत्रीही राजकीय चर्चा करायला दिल्लीला पळाले. बदलापूरला का गेले नाहीत? त्यावर उत्तर का आले नाही? घटना घडल्यापासून एफआयआर दाखल करेपर्यंत 7 दिवसांचा विलंब का झाला? असा सवाल करत घडलेली घटना भयंकर असून यावर वामन म्हात्रे, किसन कथोरे आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रियाही भयानक आहे. त्यांच्यावरच एफआयआर दाखल झाली पाहिजे.

राज्याचा मुख्यमंत्री संशयी आत्मा; संजय राऊत यांचा घणाघात, फेक नरेटीव्हवरूनही केला मिध्यांवर प्रहार

परत परत रस्त्यावर का उतरावे लागते?

दरम्यान, पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन 2022, 2023 आणि आताही सुरू आहे. गेल्यावर्षीही याबाबत आश्वासन दिले. आम्हीही यावर आवाज उठवत असून शरद पवार इंडिया आघाडीच्यावतीने आंदोलनात उपस्थित राहणार आहेत. पण या विद्यार्थ्यांना परत परत आंदोलन का करावे लागते? दोन पेपर एकाच दिवशी नको अशी त्यांची भूमिका आहे. हे एमपीएससीला कळत नाही का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

Sharad Pawar स्वत: विद्यार्थ्यांच्या आंदोलनात उतरणार; सोशल मीडियावरून दिली माहिती

मुंबई महानगर पालिकेला पत्र

मुंबई महानगरपालिकेतील ‘कार्यकारी सहाय्यक पदासाठी’ जाहिरात प्रसिद्ध झाली, मात्र या नमूद अटींमध्ये काही अशा जाचक अटी आहेत, की त्यामुळे 2 ते 3 लाख मुला-मुलींना परिक्षेचा अर्जच भरता येणार नाहीये. त्या अटी रद्द व्हाव्यात अशी मागणी करणारं पत्र आदित्य ठाकरे यांनी मुंबईचे आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिलं आहे. या पत्राची दखल घेतील आणि बेरोजगारीचा मोठा प्रश्न समोर असलेल्या युवकांना अटी शिथिल करून दिलासा देतील, अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.