माझी सुरक्षा काढून जनतेच्या सुरक्षेसाठी वापरा, सुप्रिया सुळे यांची गृहमंत्र्याना विनंती

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आले आहे. बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर बदलापूर रेल्वे स्थानकात संतप्त नागरिकांनी तब्बल 10 तास रेल रोको केला. या घटनेनंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या घटनेनंतर मिंधे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील पोलीस यंत्रणेवर येणारा ताण लक्षात घेता त्यांना स्वत:ला देण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था काढून ती जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावी अशी विनंती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबत एक ट्विट करत गृहमंत्रालयाने राज्यातील लोकप्रतिनिधींना तसेच ज्यांना ज्यांना सुरक्षा व्यवस्था दिला आहे त्याचा आढावा घ्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

”महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गेली काही महिन्यांपासून अतिशय गंभीर आहे. जनता असुरक्षित वातावरणात जगत असून सततच्या अप्रिय घटनांमुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. महिला, अबालवृद्ध कुणीही सुरक्षित नाहीत. गुन्हेगार निर्ढावले असून कायद्याचा धाक उरलेला नाही. यंत्रणा राबविताना पोलीस यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण पडतोय,हे स्पष्टपणे दिसत आहे.दुसरीकडे माझ्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी मोठी पोलीस यंत्रणा काम करत आहे. परंतु एका बाजूला कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणेचं बळ कमी पडत असताना दुसरीकडे हि सुरक्षा घेणं योग्य नाही. म्हणून गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की कृपया माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी. माझ्या सुरक्षेसाठी दिलेले हे पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत.यासोबतच राज्यातील ज्यांना ज्यांना सुरक्षा व्यवस्था दिली आहे त्या सर्वांच्या सुरक्षेच्या गरजेबाबत तातडीने आढावा घ्यावा व ज्यांना गरज नाही, त्यांची सुरक्षा काढून ते पोलीस कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी देण्यात यावे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था चोख राहावी व जनतेला सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी गृहमंत्र्यांनी हा निर्णय तातडीने घ्यावा ही नम्र विनंती’, अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी शेअर केली आहे.