बलात्काऱ्यांना दहशतवाद्यांसारखे वागवले पाहिजे! आदित्य ठाकरे यांचा संताप

बदलापूरच्या घटनेवर शिवसेना नेते- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त केला. बलात्काऱ्याला दहशतवाद्यासारखी वागणूक द्यायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.

‘आम्ही दररोज महिलांसाठी सेल्फ डिफेन्सचे वर्ग सुरू करण्याचा विचार करतो. पुढच्या काही दिवसांत असे वर्ग सुरूही होतील. दुर्दैवाने असे वर्ग सुरू करणे ही काळाची गरज बनली आहेच, पण मुळात सुरक्षेची जबाबदारी महिलांवर का असावी? समाज आणि कायदा महिलांना सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाही का? असा सवाल त्यांनी केला.

देशभरातून रोज विनयभंग, बलात्काराच्या घटना ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे आपला संताप होतो. जलदगती न्यायालयात खटला चालवावा, पीडितेला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, हीच आमची अपेक्षा आहे. बलात्कारासारखा अपराध सहन करता येणारा नाही, आज बदलापूर प्रकरणाबाबत ऐकून मन सुन्न झालं आहे. खरं तर बलात्कार हा बलात्कार असतो, अशा प्रकरणात आरोपीच्या वयाचा विचार न करता त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

राष्ट्रपतींना विनंती, शक्ती विधेयकाला संमती द्या

महाराष्ट्राबाबत मी पुन्हा एकदा राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना विनंती करतो की, प्रदीर्घ काळापासून प्रलंबित अशा महाराष्ट्र शक्ती विधेयकाला त्यांनी संमती द्यावी. यामुळे महिलांविरुद्धच्या गुह्यांसंदर्भातील कायद्याचे सक्षमीकरण होईल, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.