
सर्वोच्च न्यायालाने आज पतंजली आयुर्वेद आणि योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्यावरील न्यायालयाचा अवमान खटला बंद केला. तसेच दोघांनी न्यायालयाची मागितलेली लेखी माफीही स्वीकारली.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा देण्यात येईल, अशी ताकीदही दिली. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने आज हा निकाल दिला. 14 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने अवमान नोटिशीवरील निर्णय राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या याचिकेवर सुनावणी केली होती, ज्यामध्ये कोविड लसीकरण आणि अॅलोपॅथीची बदनामी केल्याचा आरोप होता. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या याचिकेवर 17 ऑगस्ट 2022 रोजी अवमान खटला सुरू करण्यात आला होता. पतंजलीने अॅलोपॅथीला कुचकामी ठरवून काही आजार बरे करण्याचा दावा केला होता.