मासेमारीच्या हंगामाला उद्यापासून सुरुवात, समुद्र खवळलेलाच असल्याने मच्छिमारांना करावी लागणार प्रतिक्षा

1 जून ते 31 जुलैपर्यंत बंद असलेली यांत्रिक पध्दतीची मासेमारी उद्या 1 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. उद्यापासून मासेमारी हंगामाला प्रारंभ होणार असल्याने बंदरांमध्ये मच्छीमार सज्ज झाला आहे.समुद्र खवळलेला असल्याने अनेक मच्छिमार नारळी पौर्णिमेपर्यंत प्रतिक्षा करतात.

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अध्यादेश 2021 अन्वये 1 जून 2022 ते 31 जुलै 2022 या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय सागरी क्षेत्रात यांत्रिक नौकांनी मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली होती.

ही पावसाळी मासेमारी बंदी यांत्रिक मासेमारी नौकांना लागू करण्यात आलेली होती. पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱया बिगर यांत्रिकी नौकांना लागु नव्हती. ही शासनस्तरावरून घालण्यात आलेली मासेमारी बंदी उठल्यानंतर आज 31 जुलैपर्यत आहे. उद्या 1 ऑगस्टपासून मासेमारी हंगामाला प्रारंभ होत आहे. पण समुद्रातील शांत वातावरणाची मच्छिमारांना प्रतिक्षा लागून राहिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणातील पावसाची उघडीप पाहता या मासेमारी हंगामासाठी मच्छिमार सज्ज झालेले आहेत.