नवी मुंबईमध्ये 3 मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेक जण दबल्याची भीती

नवी मुंबईमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पाऊस सुरू असताना नवी मुंबईतील शाहबाज गावातील 3 मजली रहिवासी इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक रहिवासी दबल्याची भीती व्यक्त होत आहे.

इमारत कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही रहिवासी अडकल्याची भीती असून त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचावकार्यावर ते नजर ठेऊन असून शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलाता दिली.

आज पहाटे पाचच्या सुमारास ही इमारत कोसळली. बेलापूर वॉर्डातील शाहबाज गावातील सेक्टर-19 मध्ये ही जी+3 इमारत आहे. या इमारतीमध्ये जवळपास 13 फ्लॅट आणि चार गाळे होते. यात 52 च्या आसपास लोकं रहात होते. इमारत कोसळत असतानाच काही लोकं बाहेर निघाले, अशी माहिती कैलास शिंदे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, ढिगाऱ्याखाली दबलेल्या दोघांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणखी दोघे ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. एनडीआरएफ आणि एनएमएमसीचे बचाव पथक ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी कार्य करत आहे. तसेच ही इमारत जवळपास 10 वर्ष जुनी असल्याचा अंदाज आहे. 10 वर्षातच इमारत जीर्ण होऊ कशी कोसळली याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही शिंदे म्हणाले.