
गेले अनेक महिने एसटी कर्मचाऱयांचे पीएफ व उपदान या दोन्ही रकमांचा कर्मचाऱयांच्या वेतनातून कापण्यात आलेला सुमारे 1500 कोटींचा हिस्सा ट्रस्टकडे भरण्यात आलेला नाही. साहजिकच ट्रस्टला मिळणारे त्या रकमेवरील व्याज बुडत असून या संस्था अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे त्यांना कोटय़वधी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात कर्मचाऱयांना निवृत्तीनंतरची देणी मिळण्यात अडचण येणार आहे. राज्यातील मिंधे सरकारच्या या बेफिकिरीमुळे एसटी कर्मचाऱयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
भविष्य निर्वाह निधी व उपदान या दोन्ही रकमांचा एसटी कर्मचाऱयांचा स्वतंत्र ट्रस्ट असून यासाठी कर्मचाऱयांच्या वेतनातून कपात केलेल्या रकमेचा हिस्सा या ट्रस्टकडे भरणा केला जातो; पण कर्मचाऱयांकडून कपात करण्यात आलेल्या रकमेचा हिस्सा गेले अनेक महिने ट्रस्टकडे भरणा केला नसून ही रक्कम अंदाजे 1500 कोटी रुपये इतकी झाली आहे. ही रक्कम ट्रस्टकडे भरणा न झाल्याने गुंतवणुकीनंतर त्यावर मिळणारे कोटय़वधी रुपयांचे व्याज ट्रस्टला मिळालेले नाही. त्यामुळे या दोन्ही ट्रस्टसुद्धा अडचणीत सापडल्या आहेत.
सवलत मूल्य रक्कम आगाऊ द्या!
सरकारने सवलत मूल्य रक्कम ही दर महिन्याला एसटीकडून प्रस्ताव गेल्यानंतर न देता एसटी महामंडळाला अॅडव्हान्स द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरकारकडे केली आहे. वर्षभराची होणारी एकूण 4 हजार 400 कोटी रुपये इतकी सवलत मूल्य रक्कम सरकारकडून आगाऊ दिल्यास हा मुद्दा निकाली निघेल, असेही बरगे म्हणाले.