
हल्लीची पिढी मोबाईलशिवाय राहू शकत नाही असे बोलले जाते. उठता, बसता, जेवताना, झोपताना आणि अगदी प्रातर्विधीला जातानाही मोबाईल सोबत नेला जातो. मोबाईलवर रिल्स पाहणे, मित्रांसोबत चॅटिंग करणे हेच सर्वस्व असल्याचे तरुण मानतात आणि मोबाईलच्या आहारी जातात. मोबाईलचे हेच व्यसन जीवघेणेही ठरू शकते हे अनेकदा समोर आले आहे. असाच एक प्रकार चंद्रपुरात घडला असून आईने हातातून मोबाईल हिसकावून घेतल्याच्या रागातून तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील वायगाव खडतकर येद येथे आईने हातातून मोबाईल हिसकावल्याच्या रागातून तरुणीने गळफास घेतला. करिष्मा प्रभाकर माने (वय – 20) असे मयत तरुणीचे नाव आहे. राहत्या घरी गळफास घेत तिने आत्महत्या केल्याने माने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास योगेंद्र सिंह यादव हे करत आहेत.