तुम्ही रोजगाराबाबत खोट्याचे जाळे विणत आहात; मल्लिकार्जुन खरगे यांचा मोदींवर हल्लाबोल

देशात आणि राज्यात नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. तसेच अनेकांच्या रोजागारावरही कुऱ्हाड येत आहे. देशात बेरोजगारीची समस्या बिकट झाली असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी नोकऱ्यांबाबत खोटी आश्वासने देत आहेत. मोदीजी, तुम्ही रोजगाराबाबत खोट्याचे जाळे विणत आहात, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

याबाबत खरगे यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे खरगे यांनी मोदींनी त्यांनी रोजगाराबाबत केलेल्या घाषणेची आठवण करून दिली आहे. तसेच रोजगाराबाबत तुम्ही खोट्याचे जाळे विणत आहेत, अशी टीका केली आहे. तसेच रोजगाराबाबत तीन सवालही उपस्थित केले आहेत. या पोस्टमध्ये खरगे यांनी म्हटले आहे की, मोदीजी, काल तुम्ही मुंबईमध्ये नोकऱ्या देण्यावरून खोट्याचं जाळं विणत होतात. नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी (एनआरए) ची घोषणा करताना तुम्ही काय बोलले होता त्याची मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देऊ इच्छितो. ऑगस्ट 2020 मध्ये तुम्ही म्हणाला होता की, एनआर कोट्यवधी तरुणांसाठी वरदान ठरेल. मात्र, तसे काही झालेले नाही.

खरगे यांनी पोस्टमध्ये तीन प्रश्न विचारले आहेत. एनआरएने गेल्या 4 वर्षांपासून एकही परीक्षा का घेतली नाही? NRA ला 1517.57 कोटी निधी देऊनही चार वर्षात आतापर्यंत फक्त 58 कोटी का खर्च केले गेले? NRA ही सरकारी नोकऱ्यांसाठी भरती करणारी संस्था होती. SC, ST, OBC आणि EWS तरुणांना त्यांच्या आरक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवता यावे म्हणून NRA जाणीवपूर्वक निष्क्रिय ठेवण्यात आले होते का? असा सवालही त्यांनी केला आहे.