राज्यावर आठ लाख कोटींचा कर्जाचा बोजा; कॅग अहवालावरून महायुतीवर विरोधकांचा निशाणा

मागील दोन वर्षांत या सरकारने तब्बल अडीच लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज काढल्याने राज्यावर आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. ऋण काढून सण करण्याच्या महायुती सरकारच्या प्रवृत्तीमुळे राज्य दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर आहे. राज्य सरकार बेदरकार पद्धतीने उधळपट्टी करीत असल्याची घणाघाती टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुती सरकारवर केली आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सादर करण्यात आलेल्या ‘पॅग’च्या अहवालात महायुती सरकारच्या खर्चात ताळमेळ नसल्याचा ठपका ठेवला आहे. त्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.

‘पॅग’च्या अहवालात राजाच्या आर्थिक बेशिस्तीवरच बोट ठेवले आहे. महायुती सरकारने राज्याला दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर पोहचले आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

सरकारचा मौजमजेचा दृष्टिकोन

पुढची पिढी भिकेला लागली तरी चालेल, पण वाडवडिलांनी कष्टाने कमावलेले सर्व फुंकून टाकून फक्त आजच्या दिवशी कशी मौजमजा करता येईल, असाच सध्याच्या राज्यकर्त्यांचा राज्य चालवतानाचा दृष्टिकोन असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

 कोटय़वधींच्या पुरवणी मागण्या

अर्थसंकल्पातील तरतुदी आणि पुरवणी मागण्यांवर बोलताना ते म्हणाले की, अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी खर्च होत नसतानाही कोटय़वधी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर झाल्या. अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लगेच 94 हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मंजूर करून घेण्यात आल्या. पुरवणी मागण्यांवर चर्चेविना बहुमताच्या जोरावर या मागण्या मंजूर करून घेतल्या.

 राज्य सरकारच्या 41 सार्वजनिक पंपन्यांचा संचित तोटा 51 हजार कोटी रुपयांवर गेल्याचा ठपकाही ‘पॅग’च्या अहवालात ठेवला आहे. त्यावर नाना पटोले म्हणाले की, निष्क्रिय सार्वजनिक उपक्रमांमधील गुंतवणूक व महामंडळे पांढरा हत्ती ठरत आहेत. या महामंडळांचा संचित तोटा 50 हजार कोटींवर गेला आहे हे चिंताजनक आहे. कोटय़वधी रुपयांच्या प्रकल्पासाठी कर्ज काढायचे व त्यातून कमिशनखोरी होते. या आर्थिक अनागोंदीचा प्रतिकूल परिणाम राज्याच्या आर्थिक प्रगतीवर होईल अशी भीती नाना पटोले यांनी व्यक्त केली.