
शाळा-महाविद्यालयात दिसण्याऐवजी चंद्रपूर जिह्यातील विविध शाळांतील विद्यार्थी आता आंदोलने करताना दिसतायत. याला कारणही तसेच आहे. विद्यार्थ्यांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधी आणि शिक्षण विभागाला वेळ नाही. शाळांच्या इमारती जीर्ण होत चालल्या आहेत. शाळांमध्ये शिक्षक नाहीत, सरपटणाऱया प्राण्यांचा वावर असतो अशा समस्या विद्यार्थ्यांसमोर उभ्या आहेत. यामुळे जिह्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहेत. शाळांची दुरवस्था आणि आपल्या पाल्यांची होत असलेली फरफट पाहता पालक चिंताग्रस्त झाले आहेत.
जिह्यातील शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यास कुणालाच स्वारस्य नाही. शाळेपर्यंत पोहचायचे कसे हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. एसटी बसमध्ये अनेकदा गर्दी असल्याने विद्यार्थ्यांना गाडीतून उतरवले जाते. विद्यार्थी शाळेत पोहोचू शकत नसल्याने त्यांच्या शिक्षणावर याचा गंभीर परिणाम होत आहे. अनेक शाळेत शिक्षक नाहीत. जेथे शिक्षक आहेत ते वेळेवर येत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षक वर्गात आले तरी मोबाईलमध्ये गुंतून असतात. शिक्षकांवर कुणाचाही वचक नाही. जिह्यात अनेक शाळांच्या इमारती जीर्ण अवस्थेत आहे. विद्यार्थांना एका खोलीत, सभागृहात एकत्र बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. अनेक शाळा घाणीने आणि शाळांचे रस्ते चिखलाने माखले आहेत. विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी नाही. वारंवार सूचना करूनही यात सुधारणा झालेली नाही.
मुलींची शाळा बनली दारुडय़ांचा अड्डा
गोंडपिपरी तालुक्यातील धाबा गावात जिल्हा परिषदेची पहिली मुलींची शाळा आहे. ही शाळा आता दारुडय़ांचा अड्डा बनली आहे. शाळेच्या परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आणि खर्रा खाऊन पिचकाऱया मारलेल्या दिसत आहेत. शाळा भरायच्या आधी आणि सुटल्यानंतर येथे दारुडय़ांचा वावर असतो. शाळेच्या परिसरातील हे चित्र पाहून पालकांनी संताप व्यक्त केला आहे.