
कृष्णा नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरणारा शेरीनाला प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी 94 कोटींचा प्रकल्प महापालिका हाती घेणार असून, या प्रकल्पातून जलशुद्धीकरण करून उपलब्ध होणारे पाणी शेतीसाठी देण्याची योजना असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी सांगितले.
सांगली महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने लोकांच्या अपेक्षा वाढल्या असून, याबाबत आज आयुक्त गुप्ता यांनी सांगितले की, महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या तीन मुख्य समस्या समोर आहेत. शुद्ध पाणी, जलनिःसारण सुविधा आणि वीज या मूलभूत प्रश्नांकडेच प्रशासनाचे प्रामुख्याने लक्ष आहे.
सांगली, मिरज व कुपवाड या तीनही शहरांत जलनिःसारणच्या प्रश्नाकडे यापूर्वी दुर्लक्ष झाले असले, तरी प्राधान्याने हे प्रश्न कायमचे निकाली काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी दर पंधरा दिवसांनी संबंधित विभागाच्या बैठका घेऊन आढावा घेण्यात येत असून, प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी 31 डिसेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. जलनिःसारणमध्ये भूसंपादनाचा मुख्य अडसर होता, तोही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. येत्या काही दिवसांत तो निकाली निघेल, यात शंका नाही. यामुळे तीनही शहरांतील ड्रेनेजची समस्या डिसेंबरअखेर निकाली निघालेली दिसेल.
शेरीनाला हा सातत्याने सांगलीला भेडसावणारा प्रश्न असून, तो सोडविण्यासाठी नव्याने 94 कोटींचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पानुसार अस्वच्छ पाणी एकत्रित करून ते शुद्ध करून शेतीसाठी वापराचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे शेतीला पाणी तर मिळेलच; पण या माध्यमातून महापालिकेला उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. तसेच शेरीनाल्याचे दूषित पाणी कृष्णा नदीत मिसळल्याने होणारे नदीचे प्रदूषण रोखले जाणार आहे.
भविष्यातील लोकसंख्या गृहित धरून पिण्याच्या पाण्यासाठी वारणा उद्भव योजना हाती घेण्यात येणार असून, यासाठी 290 कोटींचा प्रकल्प अहवाल शासन मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. अमृत योजनेतून ही योजना हाती घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच शहरातील दिवाबत्तीसाठी एलईडी प्रकल्पाची सातत्याने तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांनाही शहरात कुठे दिवाबत्तीची सोय करणे आवश्यक आहे हे कळावे. यासाठी सांगलीत दोन, तर मिरज व कुपवाडमध्ये प्रत्येकी एक अशा एलईडी क्रीन लावण्यात येणार आहेत. सध्या दिवाबत्तीची तक्रार आल्यास 48 तासांत दुरुस्ती केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.