श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीरचा श्री गणेशा; कोण असणार टीम इंडियाचा कर्णधार?

टी-20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचा नवखा संघ शुभमन गिलच्या नेतृत्वात झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला आहे. झिम्ब्बावे दौऱ्यानंतर टीम इंडियाचा श्रीलंका दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यापासून टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरच्या कारकिर्दीला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्या, के.एल.राहूल आणि सूर्यकुमार यादव यांची नावे चर्चेमध्ये आहेत.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये जगज्जेते ठरल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तसेच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रवीड यांचा कार्यकाळ सुद्धा संपुष्टात आला. श्रीलंका दौऱ्यापासून मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरच्या कार्यकाळाला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा श्रीलंका दौरा 27 जुलैला सुरू होणार आहे. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. परंतु या दौऱ्यासाठी कर्णधारपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर असणार हे अद्याप निश्चीत झाले नाही.

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे मुख्य खेळाडू निवृत्त झाल्यामुळे प्रामुख्याने हार्दिक पंड्या, के.एल.राहूल आणि सूर्यकुमार यादव यांची नावे पुढे येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंका दौऱ्यासाठी रोहित शर्मा जाणार नाही. त्यामुळे वनडे सामन्यांसाठी के.एल.राहूलच्या खांद्यावर कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. तसेच टी-20 साठी हार्दिक पंड्या कर्णधार होऊ शकतो. श्रीलंका दौऱ्यासाठी जर पंड्याला विश्रांती देण्यात आली, तर सूर्यकुमार यादवची कर्णधार पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.