विधानसभेनंतर राज्यातील ‘एमबीबीएस’ सरकार जाणार; सुप्रिया सुळेंचा ठाम विश्वास, वाढत्या गुन्हेगारीवरून फडणवीसांवरही निशाणा

गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात आणि जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीच्या घटनांत वाढ झाली आहे. पोर्शे कार अपघात, ड्रग्ज, आणि महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे मी नव्हे तर केंद्र सरकारच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. हे पूर्णपणे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.

राज्यात आज अतिशय गंभीर परिस्थिती असून पुण्यात सातत्याने गुन्हेगारी वाढत आहे. मी आरोप करत नाही केंद्र सरकारची आकडेवारी सांगत आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. अगोदर नागपूर केंद्र असायचं आता पुणे आहे. आधी नागपूर क्राईम कॅपिटल होते आता पुणे होत आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्र सरकार काय करते? महाराष्ट्राचे गृहमंत्री काय करतात? सातत्याने हे सुरू आहे. या राज्यात सर्व सावळा गोंधळ सुरू आहे. 200 आमदारांचे सरकार आहे, पण तुमच्या आणि माझ्या पदरात काय पडले, विकास कोणाचा केला या सरकारने ? महाराष्ट्राचा आज देशात नंबर खाली जायला लागला आहे, असेही त्यांनी म्हटले.

त्या म्हणाल्या की, आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाणांचा हात असल्याचा आरोप भाजपने मुंबईतून केला. त्यानंतर सातव्या दिवशी ते भाजपमध्ये गेले आणि पंधराव्या दिवशी ते भाजपचे खासदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी पक्ष म्हणाले. मोदींनी राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागातील घोटाळ्याचे आरोप केला होता. मात्र घडलं काय, ज्यांच्यावर आरोप केले आज ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळं भाजप म्हणजे वॉशिंग मशीन झालेली आहे. भाजप म्हणजे भ्रष्टाचार जुमला पार्टी आहे.

भारतीय जनता पक्ष अगोदर लोकांवर आरोप करतात, त्यानंतर त्यांचा भाजपा किंवा मित्र पक्षात प्रवेश घेतात आणि नंतर मंत्री, आमदार किंवा खासदार पदावर बसतात. भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारांची टोळी आहे. रवींद्र वायकर हे भ्रष्टाचारी आहेत की नाही याचे उत्तर फक्त देवेंद्र फडणवीस देऊ शकतात. कारण ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहे. महाराष्ट्रातले जे आमदार खासदार आज महायुती बरोबर आहेत, ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सिद्ध झाले नाही. खरं काय खोटं काय याची एक पारदर्शक श्वेतपत्रिका या राज्याने मागितली पाहिजे. नक्की भ्रष्टाचारी कोण, या राज्यात भ्रष्टाचार कोण करत आहे, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी विचारला. केंद्रीय संस्थांचा तपास मागे लावायचा, नंतर वॉशिंग करायचं आणि पक्षात घ्यायचं असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

रविंद्र वायकरही भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ: नाना पटोले

राज्यातील महायुतीचे सरकार हे म्हणजे “एमबीबीएस सरकार” आहे. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारी वाढवणारे सरकार आहे. या सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचे काय हाल आहे, हे आपण सर्व पाहतच आहेत. दुधाला, साखरेला काय भाव आहे हे आपल्याला माहीतच आहे त्यामुळे ऑक्टोंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर हे ‘एमबीबीएस’ सरकार जाणार, असा ठाम विश्वास त्यांनी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.