“भाजपाचा पराभव केवळ अजितदादांमुळे झालेला नाही तर…”, रोहित पवारांचे खळबळजनक ट्विट

लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यात पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेना, अजित पवार गटाला सोबत घेऊनही भाजपप्रणित महायुतीला 17 जागांवर विजय मिळवता आला, तर महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या. महायुतीच्या या खराब कामगिरीचे खापर सध्या अजित पवार गटावर फुटत आहे. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तणावही निर्माण झालेला असून आरएसएसच्या मुखपत्रातूनही भाजपाला खडेबोल सुनावण्यात आले. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाचा पराभव केवळ अजितदादांमुळे झालेला नाही, असे ट्विट केले आहे.

महाविकास आघाडीच्या विरोधात दुहेरी लढतीत जनता आपल्याला पराभूत करते म्हणून तिरंगी लढत झाली पाहिजे, तिरंगी लढत झाल्यास सर्वसामान्य जनतेची मते विभागली जाऊन भाजपला फायदा होतो, असा भाजपच्या चाणक्यांचा कयास आहे. त्यामुळेच तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादांना बळीचा बकरा करण्यात येत असून आधी आरएसएसच्या मुखपत्रातून टीका, नंतर झोपलेले तथाकथित गांधी जागा करायचे आणि आता पुढे काहीतरी करून अजितदादांना वेगळे होण्यास भाग पाडायचे ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडली असल्याची चर्चा आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.

महायुतीची सर्व इंजिन बंद पाडून ‘मविआ’ विधानसभा जिंकेल; संजय राऊत यांचा ठाम विश्वास

परंतु मुळात भाजपचा पराभव केवळ अजितदादांमुळे झालेला नाही तर भाजपच्याच शेतकरी, युवा विरोधी धोरणांमुळे झालेला आहे. भाजप नेत्यांच्या अहंकारामुळे, जनतेला गृहीत धरून चालण्याच्या वृत्तीमुळे, पक्ष फोडण्याच्या कृत्यांमुळे, महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड केल्यामुळे झालेला आहे. त्यामुळे अजितदादांना वेगळे करून तिरंगी लढती करून उपयोग नाही. शेतकरी, युवा यांना गृहीत धरून चालणाऱ्या, मराठी स्वाभिमान गहाण टाकून महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवणाऱ्या भाजपला धडा शिकवल्याशिवाय हा महाराष्ट्र शांत बसणार नाही, याची दखल चाणक्यांनी घ्यायला हवी, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.