विजय पक्का, आता जास्तीत जास्त मतांनी जिंकायचं! आदित्य ठाकरे यांचा पदाधिकारी मेळाव्यात निर्धार

मुंबईकर काय म्हणतायत, मुंबईकरांचा विश्वास कोणावर आहे हे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून पुन्हा एकदा स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मुंबईकरांनी महाविकास आघाडीला 5-1 असा निकाल दिला आहे. चौथी सीट जी हातातून गेली ती आपण पुन्हा जिंकणार. हा निकाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावासाठी दिला आहे. हा फार मोठा विजय आहे. पुढील निवडणुकीत मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचा असेल हे ठरवण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. त्यामुळे आपला विजय पक्का आहे. आता जास्तीत जास्त मतांनी जिंकायचे, असा निर्धार शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

सांताक्रुझमधील वाकोला येथे आज विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले, शिक्षक-पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची आज झालेली बैठक ही फार महत्त्वाची आहे. ही आपली निवडणूक चार महिन्यांनी येणाऱ्या विधानसभेची तयारी आहे. आपण जिंकून येणार ही खात्री आहेच, पण आता लोकांना कळले आहे की, महाराष्ट्रहिताचे काही बोलायचे असेल तर उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले. यावेळी शिवसेनेचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शिवसेना नेते अनिल परब, आमदार संजय पोतनीस, विभागप्रमुख महेश पेडणेकर, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, माजी नगरसेवक सदानंद परब, महिला विभाग संघटक रजनी मेस्त्राr उपस्थित होते.

आताच अर्धी लढाई जिंकलो आहोत

सिनेट, शिक्षक, पदवीधर मतदारसंघासाठी नोंदणी करणे सुरू आहे, मात्र पुनः पुन्हा नोंदणी करण्याची पाळी येऊ देऊ नका. आपल्या सर्व अंगीकृत संघटनांनी घेतली आहे. त्यामुळे नोंदणी 90 टक्क्यांहून जास्त झाली आहे. तुम्ही सगळय़ांनी मेहनत केली आहे. त्यामुळे अर्धी निवडणूक आपल्या हाती आली आहे, अर्धी लढाई आपण जिंकलो आहोत. मात्र, निवडणुकीत सर्वात जास्त महत्त्वाचे आहे की, जी आपली लोपं आहेत त्यांना मतदानाच्या दिवशी मतदान पेंद्रापर्यंत नेण्याची जबाबदारी आपली आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

अमोल कीर्तिकर यांची जागाही आपण जिंकणार 

मुंबईतील गद्दार नगरसेवक, आमदार, खासदार पळून गेले आणि  आपली यंत्रणा खेचून नेल्यावरही लोकसभेत आपण नऊ जागा जिंकलो. निगेटिव्हमधून सुरू करूनही आपण नऊ जागा जिंकलो. जो पक्ष सत्तेत असून त्या पक्षाला दुसरीकडून नेते घ्यावे लागले, ईडीच्या धाडी टाकून कारवाई करावी लागली, असे करूनही तो पक्ष नऊवर आहे. मुंबईत अमोल कीर्तिकर यांची जागाही आपण जिंकणार हा शब्द आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.