निवडणुकीसाठी संपूर्ण व्यवस्था बिघडवली या मिंधे-भाजपा सरकारने; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी दूषित पाणी आणि पाणीपुरवठ्यावरून शिंदे-भाजप सरकारला फटकारले आहे. मुंबईत अनेक भागात नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येवरून ट्विट केले आहे. या ट्विटमधून आदित्य ठाकरे यांनी शिंदे-भाजप सरकारचा समाचार घेतला आहे. ‘मुंबईत अनेक ठिकाणी नागरिकांना दूषित पाणी मिळतंय किंवा पाणी पुरवठा नीट होत नाहीये असं कळतंय. मुंबई महानगरपालिकेने ह्या विषयावर स्पष्टीकरण द्यायला हवं. निवडणुकीसाठी संपूर्ण व्यवस्था बिघडवली ह्या मिंधे-भाजपा सरकारने, आता परिणाम सारी मुंबई भोगत आहे’, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईत वरळीत अनेक ठिकाणी भेटी देत पाहणी केली. साईकृपा सेवा मंडळामागील समुद्रकिनारी लावलेल्या पाणी उपसा पंपाची पाहणी केली. ह्यावेळी मान्सूनपूर्व नाले सफाईची कामे अजूनही अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. महानगरपालिकेने ही कामे लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा येथे साचलेला कचरा पाहता, साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

वरळीतील वीर जिजामाता नगर परिसरातील गल्ल्यांमध्ये पडलेला राडारोडा, नाले सफाई इत्यादी मान्सूनपूर्व कामांची पाहणी केली. वरळीतील १४१ टेनामेंट बीएमसी चाळ परिसरात मेट्रोच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर राडारोडा जमा झाला आहे. त्यामुळे परिसरात पाणीदेखील साचत आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महानगरपालिकेने लवकरात लवकर इथला राडारोडा उचलणे, आवश्यक आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.