सांगलीतील सुमारे 400 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष कोसळला

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मिरज तालुक्यातील भोसे येथील सुमारे 400 वर्षांपूर्वीचे वडाचे झाड सोमवारी आलेल्या वादळी पावसात कोसळले. महामार्गास अडथळा ठरणाऱया या वटवृक्षाला वाचविण्यासाठी ‘वनराई’ संस्थेसह पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केले होते. मात्र, महामार्गाच्या कामात कमकुवत झालेला हा वटवृक्ष सततच्या पावसाने सोमवारी कोसळला. या वटवृक्षाचे आहे त्या जागी पुनर्वसन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

भोसे येथील यल्लम्मादेवी मंदिरासमोर सुमारे 400 वर्षांपूर्वीचा हा वटवृक्ष आहे. नागपूर-रत्नागिरी महामार्गास अडथळा ठरणारा हा वटवृक्ष तोडण्याचा घाट महामार्ग प्राधिकरणाने घातला होता. मात्र, पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि ‘वनराई’ संस्थेच्या पदाधिकाऱयांनी वटवृक्षाखालीच उपोषण करून वृक्षतोडीला विरोध केला. या आंदोलनाची दखल घेऊन तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी हा वटवृक्ष तोडू नये, असे आदेश दिले. यासाठी कायद्यामध्येही बदल करण्यात आले. तर, आदित्य ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वटवृक्ष न तोडता रस्त्याचा आराखडा बदलण्याचे आदेश दिले. त्यानुसार नव्याने आराखडा बनवीत वटवृक्षाला खेटून हा महामार्ग पुढे नेण्यात आला. मात्र, या कामादरम्यान वृक्षाची मुळे कमकुवत झाली असावीत. गेले पाच दिवस या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. ओढय़ाला प्रचंड पाणी असल्याने हा वटवृक्ष स्वतःच्याच भाराने कोसळला.