
तहसील आणि खनिकर्म विभाग सुस्तावलेला असल्याने रत्नागिरीत वाळूमाफियांची दादागिरी सुरू झाली आहे. वाळू माफियांनी शुक्रवारी थेट उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यानंतर तहसीलदार कार्यालयाला जाग आली असून ते आता कारवाईसाठी सरसावले आहेत. उपजिल्हाधिकारी हर्षलता धनराज गेडाम मॉर्निंग वॉकसाठी पांढरा समुद्र येथे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी समुद्रकिनाऱ्याचे मोबाईलवर चित्रिकरण सुरू केले. त्याचवेळी वाळूमाफिया वाळू चोरी करत होते. या वाळू चोरीचे चित्रिकरण केल्याचा त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी दादागिरी करायला सुरूवात केली.
वाळू चोरीचे चित्रीकरण केल्याच्या संशयावरून उपजिल्हाधिकारी हर्षलता धनराज गेडाम यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी फावडा घेत उपजिल्हाधिकारी गेडाम यांच्या दिशने सरसावले. उपजिल्हाधिकारी गेडाम या कराटे नॅशनल चॅम्पियन असल्याने त्यांनी हल्लेखोरांनाच पाणी पाजले. शुक्रवारी सकाळी पांढरा समुद्र येथे ही घटना घडली. वाळू माफियांनी थेट उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला केल्यामुळे वाळू चोरीचे प्रकरण ऐरणीवर आले आहे. या प्रकरणी गेडाम यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर वाळू चोरांवर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी मंडल अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पांढरा सुमद्र येथे गेली अनेक वर्ष बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू आहे. त्याचबरोबर काळबादेवी परिसरातही वाळू उत्खनन केले जाते.अनेक वेळा स्थानिकांनी तक्रार करूनही तहसील कार्यालयाकडून दुर्लक्ष होते. या वाळूचोरी आणि वाळू माफियांकडे मंडळ अधिकारी आणि तलाठी दुर्लक्ष करतात. तहसीलदार कारवाई करण्याचे आदेश देतात तेव्हा कारवाईच्या आधीच टिप वाळू माफियांना मिळते आणि कारवाईवेळी घटनास्थळी काहीही सापडत नाही. त्यामुळे वाळूमोफिया राजरोसपणे वाळू चोरी करत आहेत. तसेच आता त्यांची दादागिरीही सुरू झाली आहे.