सामना अग्रलेख – मोदींची तिसरी कसम, चौथा अंकच खरा!

भाजप हा मिठाला व शब्दाला जागणारा पक्ष नाही आणि मोदी हे त्याबाबतीत प्रख्यात आहेत. मोदी यांचे भारतीय सभ्यता व संस्कृतीशी नाते नाही हे चंद्राबाबू वगैरे लोकांना माहीत आहेच, पण बाबू यांनीही राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत. त्यामुळे भारतीय सभ्यता व लोकशाहीला इजा पोहोचेल असे कृत्य ते करणार नाहीत. मोदी यांना तिसऱ्यांदा शपथ घ्यायची आहे म्हणून ते नितीश कुमार व चंद्राबाबूंचा वापर करतील, पण ही तिसरी ‘कसम’ म्हणजे मोदी-भाजपच्या अंकाचा चौथा अंक ठरेल. पडद्यामागची नवी पटकथा घडताना देश पाहत आहे.

नरेंद्र मोदी व त्यांच्या भाजपचा पुरता पचका लोकसभा निवडणुकांच्या निकालात झाला आहे. जनतेने त्यांना जवळ जवळ सत्तेवरून खाली खेचले आहे. ही खेचाखेची करताना जनतेने सभ्यता व संस्कृतीचे दर्शन घडवले. त्याचा गैरफायदा मोदी घेत आहेत. भारतीय जनता पक्षाला सरकार बनवण्याइतपत साधे बहुमतही मिळालेले नाही. 240 वरच त्यांचा भटकता आत्मा लटकताना दिसत आहे. तरीही मोदी यांनी बहुमत दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले आहेत. लोकसभा निकालांनी मोदी यांना जमिनीवर आणले व त्यांनी सांगितले की, ‘माझ्या आईच्या मृत्यूनंतरची ही माझी पहिली निवडणूक आहे.’ चला, अखेर मोदी यांनी मान्य केले की, ते आकाशातील झग्यातून पडले नाहीत, तर त्यांचाही जन्म इतर मर्त्य मानवांप्रमाणे आईच्या कुशीतूनच झाला. मोदींना हे असे बोलण्याशिवाय पर्याय नाही. कारण त्यांच्या देवत्वाचा, अवतारगिरीचा व बाबागिरीचा मुखवटा खुद्द काशी नगरीतच जनतेने ओरबाडून काढला आहे. मोदी हे आता त्यांच्या ‘ब्रॅण्ड’चे म्हणजे मोदी सरकार बनवत नाहीत तर त्यांनी ‘रालोआ’चे सरकार बनवत असल्याचे जाहीर करून स्वतःचा पराभव मान्य केला. ‘मोदी सरकार’, ‘मोदी गॅरंटी’, ‘मोदी है तो मुमकीन है’, ‘मोदी तो भगवान है,’ अशा फेकू कल्पनांना कालच्या निकालांनी केराची टोपली दाखवली. मोदी यांनी सरकार बनवलेच तर त्यांचे चित्र हे एक व्यंगचित्र असेल. संपूर्ण शरीरभर फॅक्चर व प्लॅस्टर लपेटलेले मोदी हे नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांच्या कुबडय़ा घेऊन चालत आहेत. त्या कुबड्यांच्या आधारेच त्यांना सरकार चालवावे लागेल. या कुबड्याही अखेरपर्यंत साथ देतील काय याची गॅरंटी नाही. मोदींच्या भाजपला 240 जागा मिळाल्याचे सांगितले जाते. या

आकड्यातही घोळ

आहे. एनडीए म्हणून 291 चा आकडा दाखवला जातोय तो फसवा आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी मोदी यांनी बहुमताचा कागद राष्ट्रपती भवनात सादर केला तरी तो कागद व त्यावरील बहुमताचा आकडा म्हणजे त्यांच्या ‘एम.ए.’ इन एन्टायर पॉलिटिक्स या डिग्रीप्रमाणे रहस्यमय असेल. मोदींकडे स्वतःचे बहुमत नाही व कुबडय़ांवरचे बहुमत मोदी यांच्या बाणेदार स्वभावास मानवणारे नाही. म्हणूनच भारतीय जनतेने अत्यंत सभ्यपणे मोदी यांना सत्तेवरून खाली उतरण्याचा संदेश दिला आहे. तुमचे काम झाले आहे. उगाच रेंगाळू नका व स्वतःची जास्त बेअब्रू करून घेऊ नका, पण ‘सभ्यता’ व ‘संस्कृती’ या दोन महान हिंदू शब्दांशी मोदी व शहा महाशयांचा संबंध आला नसावा म्हणून आता मोदींचे सरकार नाही, तर एनडीएचे सरकार बनवत असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसे झाले तर मोदी यांना अनेक कुबडय़ांच्या अटी-शर्तींवर काम करावे लागेल. मोदी आतापर्यंत एनडीए वगैरे मानायला तयार नव्हते, पण काशीच्या देवांनी प्रभू श्रीरामांना त्यांच्यातला अहंकार संपविण्यासाठी एनडीएच्या चरणी आणले. मोदींना या वेळी राम पावला नाही. कारण श्रीराम हा अहंकाराचा शत्रू आहे व अहंकाराचा पराभव करून त्याने अयोध्येचे रामराज्य स्थापन केले. वाराणसीचा प्रचार संपताच मोदी यांनी 10 पॅमेऱयांसह ध्यान सुरू केले, पण वाराणसीत त्यांचे मताधिक्य जोरदार घसरले. हा देवाचा प्रसादच म्हणावा लागेल. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या 240 जागा हा ‘मोदी’ ब्रॅण्डचा चमत्कार नाही. राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्षांच्या मदतीने भाजपने हा आकडा गाठला. मोदी यांनी महाराष्ट्रात 18 सभा व अनेक रोड शो केले. 18 पैकी 14 जागांवर

भाजपचा पराभव

झाला. मोदी नागपुरात गेले नाहीत. तेथे भाजपचे नितीन गडकरी विजयी झाले. भारतीय जनता पक्षाचा ‘आरोप’ होता की, महाराष्ट्रात मोदींचा फोटो लावून शिवसेनेचे खासदार जिंकले. भाजपचा हा भ्रम या वेळी लोकांनी तोडला. उद्धव ठाकरे यांचा चेहरा घेऊन शिवसेनेचे नऊ खासदार जिंकले व शरद पवारांचा चेहरा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ खासदार विजयी झाले. उलट महाराष्ट्रात ‘मोदी मोदी’ करणाऱ्यांचा आकडा 23 वरून 9 वर आला. महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या त्या मोदींशिवाय. मोदी वगैरे लोकांशी मैत्री ठेवण्यापेक्षा त्यांच्याशी शत्रुत्व केले तर ते फायद्याचे ठरते. मोदी व त्यांचा मतलबी पक्ष त्यांना संकटात साथ देणाऱ्या मित्रांनाच संपवून टाकतो हा अनुभव आहे. त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांनी अत्यंत सावध राहिले पाहिजे. बाबूंचे बोट धरून भाजप आंध्रात घुसला आहे. बाबूंना संपवायचा प्लॅन त्यांच्या डोक्यात घोळतच असेल. नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाने दहा वर्षे दिल्लीत मोदी यांच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला. दहा वर्षांनी ओडिशातून नवीन पटनायक व बिजू जनता दलास भाजपने संपवून टाकले. पटनायक हे आता वनवासातच गेले. देशभरात भाजपने हेच आणि हेच केले. भाजप हा मिठाला व शब्दाला जागणारा पक्ष नाही आणि मोदी हे त्याबाबतीत प्रख्यात आहेत. मोदी यांचे भारतीय सभ्यता व संस्कृतीशी नाते नाही हे चंद्राबाबू वगैरे लोकांना माहीत आहेच, पण बाबू यांनीही राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत. त्यामुळे भारतीय सभ्यता व लोकशाहीला इजा पोहोचेल असे कृत्य ते करणार नाहीत. मोदी यांना तिसऱयांदा शपथ घ्यायची आहे म्हणून ते नितीश कुमार व चंद्राबाबूंचा वापर करतील, पण ही तिसरी ‘कसम’ म्हणजे मोदी-भाजपच्या अंकाचा चौथा अंक ठरेल. पडद्यामागची नवी पटकथा घडताना देश पाहत आहे.