
देश पातळीवर भाजपकडून होत असलेले द्वेष भावनेचे राजकारण आणि राज्यांमध्ये चुकीचा पायंडा पाडून आलेले सरकार हे जनतेला मान्य नाही, हे दिसून येत आहे. जनतेने या बेकायदा सरकारविरोधात कौल दिला आहे. महाविकास आघाडीला जनतेने भक्कम साथ दिली असून सरकार विरोधातील रोष व्यक्त केला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. नगर जिल्ह्यात विखे यांच्याकडून होत असलेले दहशतीचे राजकारण व चुकीच्या प्रशासनामुळे त्यांचा पराभव झाल्याचे थोरात यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. देशातील सध्याचे राजकारण आणि राज्य पातळीवर चुकीचा पांयडा पाडून आलेले सरकार या विरोधात जनतेमध्ये रोष आहे. जनतेला असे चुकीचे राजकारण मान्य नसून जनतेने तो राग मतदानातून व्यक्त केला आहे.
सत्ताधाऱ्यांकडून होत असलेला सत्तेचा गैरवापर, त्याचप्रमाणे वाढलेली बेरोजगारी, महागाई, भरतीमधील गैरव्यवहार ,विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत गैरव्यवहार, राज्यात बिघडलेली राज्यातील शांतता सुव्यवस्था यामुळे जनता या सरकारवर नाराज आहे. भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार नसतानाही सातत्याने जनतेमध्ये संपर्कात होते. त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
नगरमध्ये सुजय विखे तरुण होते. त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील मात्र मंत्री विखे यांनी ज्या पद्धतीने दहशतीचे राजकारण करून चुकीचे प्रशासन राबवले याबद्दल जिल्ह्यात मोठा रोष निर्माण झाला. जनतेने विखे यांच्या दहशतीचे झाकण उडवले आहे. निलेश लंके हा एक सामान्य कार्यकर्ता आहे. त्यांनी कोरोना काळात त्यांनी मोठे काम केले. परंतु पारनेर मध्ये सरकारकडून निर्माण केलेली दहशत यामुळे निलेश लंके यांनी त्यांना मोठी टक्कर देऊन विजय मिळवला आहे.
काँग्रेसचा विचार हा शाश्वत विचार असून देशाच्या विकासाचा विचार आहे. त्याला ताकद देण्याचे काम सर्वांनी करायचे आहे .राज्यात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असून आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचा सरकार येणार असून मुख्यमंत्रीही महाविकास आघाडीच्या होणार आहे. खरे तर राज्यामध्ये सध्याचे सरकार कसे आले हे मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री यांना माहिती आहे. त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. जनतेला सर्व माहिती आहे. या सरकारविरुद्ध जनतेने राग व्यक्त केला असून महाविकास आघाडीला मोठा भक्कम पाठिंबा दिल्याबद्दल आमदार बाळासाहेब थोरात यांनी जनतेचे आभार व्यक्त केले असून हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा विजय असून यामध्ये काम केलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचे कौतुकही त्यांनी केले. यावेळी गुलालाची उधळण करत जिलेबी वाटत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.