राष्ट्रीय लोकन्यायालयात 64 हजार 722 प्रकरणे निकाली; राज्यात नगर तिसऱ्या क्रमांकावर

राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये 64 हजार 722 प्रकरणे निकाली निघाली आहेत. यामध्ये 1 अब्ज 38 कोटी 22 लाख 51 हजार 304 रुपयांची वसुली झाली. राज्यात नगर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जिल्हा सरकारी वकील ॲड. सतीश पाटील, नगर बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. नरेश गुगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधिक्षक (गृह) हरीश खेडकर,ॲड. भूषण बऱ्हाटे, ॲड. विक्रम वाडेकर, ॲड. सागर पदिर, ॲड. राजाभाऊ शिर्के, ॲड. पिंटू पाटोळे, ॲड.अंधारे आदी उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी प्रस्ताविक केले. ॲड. वृषाली तांदळे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. सुनील मुंदडा, यांनी आभार मानले.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. लोकन्यायालयामध्ये ग्रामपंचायत थकीत कर, जिल्हा परिषद, महसूल आणि वीज वितरण, बँका, पतसंस्था, विमा कंपन्या यांचे कर्ज, दावे आदी प्रकरणे ठेवण्यात आली होती. कौटुंबिक न्यायालयात ही कौटुंबिक विवादाची प्रकरणे ठेवण्यात आली होती. औद्योगिक, कामगार न्यायालयातील प्रकरणांचाही समावेश होता.

न्यायालयात दाखल पूर्व 60 हजार 777 प्रकरणे निकाली निघाले. प्रलंबित 3 हजार 945 प्रकरणांचा निपटारा झाला. लोकन्यायालयामध्ये 1 अब्ज 38 कोटी 22 लाख 51 हजार 304 रुपयांच्या रक्कमेची वसुली झाली. लोकन्यायालयात प्रकरणे निकाली काढण्यात जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक आला. लोक न्यायालय यशस्वी करणे कामी दोन्ही बारचे सदस्य व जिल्हा न्यायालयाचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.