पाणी जपून वापरा, मुंबईत दोन दिवस 10 टक्के पाणी कपात

मुंबईला पाणीपुरवठा होणार्‍या वैतरणा जलवाहिनीच्या 900 मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाल्यामुळे संपूर्ण मुंबईत उद्या गुरुवार 17 ऑक्टोबर आणि 18 ऑक्टोबर रोजी 5 ते 10 टक्के पाणी कपात केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि पाण्याचा साठा करून ठेवावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबई शहर व उपनगरास मुख्यत्वे वैतरणा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणामधून पाणी वाहून नेणार्‍या वैतरणा जलवाहिनीवरील यंत्रणेमधील ताराळी (जिल्हा ठाणे) येथे  900 मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी धरणामधून पाणी वाहून नेणारी यंत्रणा अंशतः बंद करण्यात आली आहे. परिणामी, मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात (मुंबई शहर व उपनगर) पाणी पुरवठा करणार्‍या भांडूप येथील जलशुद्धीकरण केंद्रास होणार्‍या पाणीपुरवठयामध्ये 5 ते 10 टक्के घट होणार आहे. या दुरुस्ती कामासाठी सुमारे 48 तास इतका कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दोन दिवस 5 ते 10 टक्के पाणी कपात केली जाणार आहे.