जयपूरमध्ये तळघरात शिरलेल्या पावसाच्या पाण्याने घेतले तीन बळी

जयपूरसह परिसरातील भागात रात्रीपासून मुसळधार पावसाने झोड उठवली आहे. जयपूरमधील अनेक भाग पाण्याखाली गेले असून विश्वकर्मा भागातील एका तळघरात शिरलेल्या पावसाच्या पाण्यात बुडून चार वर्षांच्या चिमुरडीसह तिघांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगरमध्ये झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती जयपूरमध्येही झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे. शहरातील रस्ते, विमानतळ, रेल्वे स्थानक, काही पोलीस ठाणी व रुग्णालयांमध्येही पाणी शिरले आहे.

तळघरात गेले आणि फसले

मुसळधार पावसामुळे या लहानगीसह तिघेजण तळघरात आश्रयाला गेले होते. पण पाणी वाढत गेले आणि तळघरातही शिरले. यातून बाहेर पडणे अशक्य झालेल्या या तिघांचाही मृत्यू झाला. अद्याप एकही मृतदेह हाती लागलेला नाही. मृतदेह बाहेर काढल्यानंतर मृतांची ओळख पटवता येईल, असे महापालिका प्रशासनाने सांगितले.