लेख – इस्रायलचा घणाघात, अशांत आखात

>> प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर

मागील वर्षी 8 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले. तथापि, आता हे युद्ध नव्या वळणावर आले आहे. हमासचा म्होरक्या इस्माईल हनियेला इराणमध्येच कंठस्नान घातल्यानंतर हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरुल्ला यालाही इस्रायलने टिपण्यात यश मिळवले. यामुळे इस्रायलविरोधी शक्ती चवताळल्या आहेत. इराणने इस्रायलला प्रत्युत्तर देण्यासाठी 200 क्षेपणास्रे डागल्याने आखातात नव्या घनघोर धुमश्चक्रीचे संकेत मिळताहेत. संयुक्त राष्ट्रसंघात इस्रायली पंतप्रधानांनी केलेले भाषण आखातासह जगाची चिंता वाढवणारे आहे.

मागील वर्षी 8 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले. तथापि, आता हे युद्ध नव्या वळणावर आले आहे. गेल्या वर्षभरातील धुमश्चक्रीत अनेक नागरिकांनी प्राण गमावले. शिवाय दहशतवादामुळे इतर देशांतील अनेक नागरिकांनाही प्राणास मुकावे लागले. दहशतवादाचा संपूर्ण निपटारा करणे हे आमच्या युद्ध मोहिमेचे लक्ष्य आहे, असे इस्रायलने उघडपणाने जाहीर केले आहे. इस्रायली ओलिसांची मुक्तता करण्यासाठी हसन नसरुल्ला याचा काटा काढणे आवश्यक होते, असे गणित नेतान्याहू यांनी मांडले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केलेले भाषण हे त्यांच्या विजयी हालचालीचे प्रतीक होते.

इस्रायलच्या पाठीशी अमेरिका हे राष्ट्र उभे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी हिजबुल्लाचे बंडखोर नेते हसन यांची हत्या अनेक पीडितांना न्याय मिळवून देणारी असल्याचे म्हटले होते. तसेच इराणने क्षेपणास्र डागल्यानंतर त्यांनी अमेरिकन सैन्याला त्याच्या प्रतिरोधनाचे आदेश दिले. यावरून अमेरिकेचा इस्रायलला उघड पाठिंबा आहे असे म्हणता येईल.

हिजबुल्ला नेते हसन हे इस्रायली, अमेरिकन आणि खुद्द लेबेनॉनमधील अनेक निष्पाप लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार होते. हमास, हिजबुल्ला आणि हुती यांच्या आक्रमणापासून इस्रायलला स्वतःचे संरक्षण करण्याचा हक्क आहे व त्या हक्कापोटी इस्रायल लढत आहे. इस्रायलने हिजबुल्ला अतिरेक्यांचा बंदोबस्त केला. हमासवर अंकुश प्रस्थापित केला. आता सीरियातील हुती बंडखोरांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी इस्रायलने नवी आघाडी उभारली आहे आणि सीरिया क्षेत्रात निकराची लढाई चालू आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात केलेल्या भाषणात थेट इराणला आव्हान दिले आहे. हमास असो, हिजबुल्ला असो किंवा हुती असो, या सर्वांच्या पाठीशी इराणची रसद आहे, कुमक आहे, अर्थबळ आहे आणि चतुराई आहे. पाहुण्याच्या काठीने साप मारण्याचा इराणचा डाव आहे, हे ओळखून इस्रायलने पावले टाकली आहेत. इराणच्या पाठिंब्यामुळेच हे सर्व दहशतवादी इस्रायलविरुद्ध छायायुद्ध चालवित आहेत. त्यांचा तर बिमोड केला, परंतु आता त्यांच्या पाठीशी असलेल्या शक्तीलासुद्धा इस्रायलने आव्हान दिले आहे. इराणने केलेल्या हल्ल्यामुळे नेतान्याहू यांना आयती संधी लाभली आहे. परिणामी, आता आखातातील युद्धक्षेत्र व्यापक होण्याचा आणि संघर्ष तीव्र होण्याचा धोका निर्माण होत आहे.

नेतान्याहू यांनी घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे त्यांच्या मध्य पूर्वेतील राजकीय स्थानाला बळकटी प्राप्त होत आहे. एकेकाळी त्यांच्या लोकप्रियतेला लागलेले ग्रहण आता हटले आहे. त्यामुळे आता दहशतवादाविरुद्धचे हे युद्ध अंतिम आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे काय? त्यामध्ये खरोखरच इस्रायल निर्णायक लढाई देईल काय? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्या सर्व प्रश्नांची चर्चा वर्तमान जागतिक पार्श्वभूमीवर करणे आवश्यक आहे. इकडे चीनने इस्रायलच्या आक्रमक पावित्र्याबद्दल नाराजी व्यक्त केली असून रशियाही त्याच्या सुरात सूर मिसळत आहे. यावरून मध्य पूर्वेतील युद्धाचा तणाव विस्तारण्याची चिन्हे दिसत आहेत.

अमेरिका आणि रशिया यांच्या परस्परविरोधी राजकीय हालचालींमध्ये नेहमी क्रिया-प्रतिक्रिया असा भाग असतो. जेथे अमेरिका समर्थन देते, तेथे रशिया व चीन विरोध करतात. या वेळी खुद्द रशिया युक्रेन युद्धात गुंतलेला आहे. त्यामुळे त्याला इस्रायल-हमास संघर्षात पडण्यास वेळ नाही. अमेरिका मात्र कधी असे कधी तसे, कधी उघड, कधी गुपित पाठिंबा देत इस्रायलच्या स्वसंरक्षण अधिकारात सक्रिय पाठिंबा देत आहे. सीरियावरील अमेरिकेचे हवाई हल्ले हेच धोरण प्रकट करतात.

नेतान्याहू यांच्या नेतृत्वाचे दोन-तीन महत्त्वाचे पैलू आहेत. पहिला पैलू म्हणजे स्वराष्ट्रामध्ये आपल्या स्पर्धकांना आणि टीकाकारांना अंकित करण्याचा होय. त्यांनी युद्धकाळात सामुदायिक सरकारची उभारणी केली आणि सर्वांना बरोबरीने घेतले. इस्रायलची भावी व्यूहरचना मध्य पूर्वेतील सत्तेचा केंद्रबिंदू होण्याची आहे. असे करताना इस्रायलला अमेरिकेचा एकमुखी पाठिंबा आहे ही गोष्ट आता उघड झाली आहे. या अगोदरसुद्धा इस्रायली नेतृत्वाला अमेरिकेचा पाठिंबा होता. परंतु साम, दाम, दंड, भेद यांचा उपयोग करून नेतान्याहू यांनी ज्या पद्धतीने हमास, हिजबुल्ला आणि हुतीवर निर्णायक विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे, ती अगोदरच्या इस्रायली नेत्यांना करता आली नाही ही गोष्ट निर्विवाद सत्य आहे. भविष्यकालीन इस्रायलचे सामर्थ्य हे त्याच्या केवळ विस्तारात नाही, तर ज्ञान विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या शक्तीमध्ये आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. इस्रायलने लेबेनॉनमधील 50 लाख लोकांचा डेटा गोळा केला आणि त्याआधारे एफ-15 विमानांचा उपयोग करून दहशतवादी संघटनेच्या गुप्त ठिकाणावर जबर हल्ले केले. विशेषतः दक्षिण बैरूतमधील हसन नसरुल्ला याच्या गुप्त ठिकाणापर्यंत इस्रायल पोहोचू शकले ते मोसादमुळे. प्रगत माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने दहशतवाद समूळ निपटून काढता येऊ शकतो हे इस्रायलने सिद्ध केले आहे. इस्रायलचे लष्कर, नौदल आणि हवाई दल याहीपेक्षा इस्रायलची ताकद कशामध्ये असेल तर ती प्रगत विज्ञान तंत्रज्ञानात आहे. इस्रायलने आपले सामर्थ्य कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राच्या आधारे प्रभावीपणे वाढविले आहे. माहिती तंत्रज्ञान युद्धातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि जगभरातील हालचालींचा उपग्रहाद्वारे वेध, यामुळे इस्रायलला प्रगत तंत्रज्ञान नवी ताकद व नवी शक्ती देत आहे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे.

भूराजनैतिकदृष्टीने विचार करता मध्य पूर्वेतील सर्वंकष सत्तासंघर्षात इस्रायलने सर्वांना नामोहरम केले आहे. पुढील काळात इस्रायल गतीने वाटचाल करून पहिल्या क्रमांकावर पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. इस्रायलने आपल्या सामरिक सामर्थ्याचा वापर करताना जबाबदारीने समतोल दृष्टिकोन ठेवला पाहिजे. नेहमीच आक्रमक आणि प्रतिक्रियात्मक भूमिका घेतल्याने प्रश्न सुटतील असे नाही. इस्रायलला या पुढील काळात अधिक सावध पवित्रा घ्यावा लागेल. विजय मिळविल्याने येणारा उन्माद टाळावा लागेल. अपमानाची भरपाई करण्यासाठी घेतलेला बदला पुरेसा झाला. आता थोडेसे मानवतावादीदृष्टीने रचनात्मक विकासाचे काम करावे लागेल. उद्ध्वस्त पॅलेस्टाईन, लेबनॉन आणि सीरिया यांच्या उभारणीसाठी संयुक्त राष्ट्रसंघ ज्या काही मोहिमा आखेल त्यापासून इस्रायलला दूर राहणे अमानवतावादी ठरेल. सारेच प्रश्न बंदुकीच्या नळकांडय़ातून सुटत नाहीत. इस्रायल, इराण मध्यपूर्वेतील पॅलेस्टाईन, लेबेनॉन, सीरिया इत्यादी राष्ट्रांची गोलमेज परिषद घेऊन भारतासारख्या देशाला शांततेसाठी पुढाकार घ्यावा लागेल. रशिया व चीन नव्हे तर भारत मध्य पूर्वेतील तणावामध्ये शांतीदूताचे काम करू शकतो. त्यामुळे इस्रायल आणि इराणला सारख्या अंतरावर ठेवून शांततेची बोलणी करण्यासाठी तयार करणे महत्त्वाचे आहे. गुटेरस यांनी मध्य पूर्वेच्या पुनर्बांधणीसाठी मांडलेला विचार आणि टाकलेली पावले याबाबतचे गांभीर्य फक्त भारताला कळू शकते. या दृष्टीने तत्काळ शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला आहे.

(लेखक आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आहेत)