भाजपाने आरएसएसशी संबंधित लोकांना वाचविण्यासाठी शिंदेचा एन्काउंटर केला – विजय वडेट्टीवार

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची मागणी होती. मात्र भाजपाने आरएसएसशी संबंधित लोकांना वाचविण्यासाठी शिंदेचा एन्काउंटर केला आहे. म्होरक्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आले असल्याचा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. अक्षय शिंदे शाळेच्या ट्रस्टींचे कारनामे उघड करू शकला असता,त्याआधीच त्याला संपवण्यात आले आहे. त्यामुळे एन्काऊंटर प्रकरणाची न्यायिक चौकशी करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुंबई येथील शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी एन्काउंटर प्रकरणाची पोलखोल केली.

वडेट्टीवार म्हणाले, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेंचा पोलीस एन्काउन्टरमध्ये मृत्यू झाला.या घटनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आरोपी अक्षय शिंदेला पोलीस तळोजा तुरुंगातून घेऊन जात असताना अक्षय शिंदेनी पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.” खरं तर मुख्यमंत्र्यांनी दोन महिन्यात फासावर लटकवू असं सांगितलं होत. त्यांची फाशी देण्याची पद्धत अशी आहे का ? हा प्रश्न आहे. ज्या प्रकारे पोलिसांनी प्रेस नोट काढली त्यामधून उत्तरापेक्षा प्रश्नच अधिक निर्माण होतात.अक्षय शिंदेला तुरुंगातून नेतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्याच्या चेहऱ्याला मास्क घातलेलं असून हाताला बेड्या लावल्या आहेत. तशाच अवस्थेत त्याला गाडीत बसवलं असेल तर मग त्यानं बेड्या लावलेल्या हातानं बंदूक कशी खेचली ?त्याला वाहनातून नेताना त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला पोलीस बसले होते का? ते बसले असतील तर आरोपीचा हात पोलिसांच्या बंदुकीजवळ कसा गेला? आरोपीनं बंदुकीचं लॉक कसं उघडलं?ज्या अधिकाऱ्यांच्या गोळ्यांनी तो जखमी झाला ती गोळी किती अंतरावरून झाडली गेली? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

वडेट्टीवार पुढे म्हणाले की , पोलिसांनी काढलेली प्रेसनोट ही हास्यास्पद आहे. कारण पोलिसांनी प्रेस नोटमध्ये स्वसंरक्षणार्थ शब्द वापरला आहे. एकाच गोळीत त्याचा मृत्यू झाला. ती गोळी त्याला ताब्यात घेण्यासाठी चालवली होती, की त्याला मारण्यासाठी चालवली होती? कैद्याला ने-आण करण्याचं काम गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचं नसतं. त्यांचं काम तपास करणं असतं. मग कैद्यांना ने-आण करण्यासाठी असे अधिकारी का नेमले? हे अधिकारी नेमण्यामागचा उद्देश काय होता? बदलापूर प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे हा महत्त्वाचा दुवा होता. आरोपीची पार्श्वभूमी हत्यारे वापरण्याची नाही, त्यामुळे पिस्तुलचं लॉक आरोपीने कसे काढले, कारण पोलीसांना यासाठी प्रशिक्षण दिलं जात. सरकारने आपटेला मोकाट का सोडला हा प्रश्न आहे. असे किती आरोपी असलेले आपटे सरकार पाठीशी घालणार आहेत अशा संतप्त शब्दात वडेट्टीवार यांनी महायुतीसरकारचे वाभाडे काढले. वृत्तपत्रात आलेल्या जाहिराती पाहून मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने एन्काउंटर झाले आहे का असा प्रश्न पडतो. महिला कुस्तीपटूंर अत्याचार करणाऱ्या ब्रिजभूषण सिंगचे एन्काउंटर का नाही केला,असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला

वडेट्टीवार म्हणाले की, नागपुरात माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार नागपुरात सहा महिन्यात सहा हजार आठशे एकोणचाळीस गुन्ह्यांची नोंद झाली आहे. लैगिंक अत्याचार 213, विनयभंग 320, पॉस्को अंतर्गत गुन्हे 172 आहेत. 213 महिलांवर लैगिक अत्याचार होत असेल तर राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे का हा प्रश्न पडतो.